Lok Sabha Election : महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा पेच कायम असताना नवा संघर्ष उफाळून आला आहे. याला कारण ठरलं ते म्हणजे उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी केलेली उमेदवाराची घोषणा. या घोषणेनंतर काँग्रेसमधून थेट ठाकरेंवर पहिला वार करण्यात आला आहे. शिल्लक शिवसेना संबोधत काँग्रेसचे संजय निरुपम यांनी अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 8 जागांवर पेच फसलेला आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांना त्यांचे वडील गजानन कीर्तिकर यांच्याविरोधात मैदानात उतरवले आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच या जागेवरून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम बिथरले आणि त्यांनी थेट ठाकरेंवरच पहिला वार केला.
शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष....
संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर टीका करताना त्यांची शिल्लक शिवसेनेचे अध्यक्ष असे म्हणत खिल्ली उडवली आहे. ""काल सायंकाळी शिल्लक शिवसेनेच्या प्रमुखांनी अंधेरीत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा केली", असे निरुपम म्हणाले.
निरुपम यांच्या पोस्टमुळे महाविकास आघाडीतील प्रमुख मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेत्याची खदखदही बाहेर आली आहे. महत्त्वाचं म्हणजे निरुपम यांनी महाविकास आगाडीचे उमेदवार असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अमोल कीर्तिकर यांना घोटाळेबाज, लाचखोर आणि कमिशन घेणाराही म्हटले आहे.
हेही वाचा >> "घोटाळेबाज, लाचखोर", काँग्रेस नेत्याचेच गंभीर आरोप, ठाकरेंचा उमेदवार वादात
"शिवसेनेच्या वतीने ज्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, तो कोण आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज आहे. त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकद्वारे लाच घेतली आहे. गरिबांना जेवण देण्याच्या योजनेत शिवसेनेच्या घोषित झालेल्या उमेदवाराने कमिशन घेतलं आहे. ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे", असे गंभीर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडीचा उमेदवार डागाळला गेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील संघर्षाची ही सुरूवात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे उत्तर काय?
संजय निरुपम यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले आहे की, "उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेची जागा आमची आहे. आम्ही आज उमेदवार जाहीर करू अथवा उद्या... हा आमचा अधिकार आहे. सोशल मीडियावर बोलण्याऐवजी संजय निरुपम यांनी काँग्रेससोबत बोलायला हवे. हा भाग वेगळा की, त्यांना काँग्रेस किती गांभीर्याने घेते. पण, तो त्यांच्या पक्षातंर्गत मुद्दा आहे", असे खोचक उत्तर ठाकरेंच्या सेनेने दिले आहे.
संजय निरुपम भाजपत जाणार?
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे संजय निरुपम आता काय करणार, असा प्रश्न उभा राहत असतानाच ते भाजपत जाऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला ही जागा सुटली नाही, तर ते भाजपत जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
हेही वाचा >> उद्धव ठाकरेंनी जाहीर केला मुंबईतला पहिला उमेदवार!
संजय निरुपम यांनी कीर्तिकर यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी व्यक्त करताना थेट हल्ला केला आहे. शिल्लक सेना... घोटाळेबाज, कमिशनखोर, लाचखोर असे शब्द निरुपमांनी वापरले आहेत. त्यावरून वेगवेगळे राजकीय तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT