नवी दिल्ली: राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये सध्या चुरस सुरु आहे. भाजपच्यावतीने अजून नाव समोर आलेले नाही. परंतु दोन नावांची चर्चा सुरु आहे. झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू आणि केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या नावाचा विचार सध्या भाजपकडून होत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या बैठकीत याबाबत चर्चा होईल आणि लवकरच राष्ट्रपती पदासाठी (Presidential Elections) नाव घोषीत केले जाईल.
ADVERTISEMENT
देशात आगामी काळात गुजरात, छत्तीसगड, मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. भाजप (BJP) या राज्यातील आणि विशेष: आदिवासी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपने देशात सध्या आदिवासी समाजासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत, त्यामुळे भाजपला आगामी काळात आदिवासी समाजाच्या मतांकडे लक्ष द्यायचे आहे. आतापर्यंत देशाच्या इतिहासात आदिवासी व्यक्ती राष्ट्रपती झालेली नाहीये. त्यामुळे मुर्मू या आदिवासी आहेत त्यामुळे त्यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित; विरोधकांकडे जास्त मतं?, मोदींना धक्का बसणार?
तर भाजपकडून दुसरे चर्चेत असलेले नाव म्हणजे आरिफ मोहम्मद खान. आरिफ खान हे राजीव गांधी आणि व्ही.पी.सिंग यांच्या कार्यकाळात मंत्री होते. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतील. एनडीएच्या वतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंह चर्चा करत आहेत.
दरम्यान भारताला २१ जुलै रोजी नवा राष्ट्रपती मिळणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलै रोजी संपत आहे, त्यामुळे देशात १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होत आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीचा संपुर्ण कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीच्या हालचाली देशात सुरु झाल्या आहेत. विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. यावेळी युपीएचा उमेदवार कोण हे यावर चर्चा झाली. मोदी सरकारच्या विरोधात एक मजबूत उमेदवार विरोधी पक्ष देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी चर्चेत होते. परंतु त्यांनी आपण इच्छूक नसल्याचे सांगितले होते.
ADVERTISEMENT