‘ऑपरेशन टायगर’ आधीच ठाकरेंचा सगळ्यात मोठा डाव; मध्यरात्रीच जारी केलं ‘ते’ पत्र, अन्…

वसेना UBT पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन दिले आहे. शिवसेना UBT हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष असून कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, देऊ नये.

thackerays biggest move even before operation tiger letter written to lok sabha speaker at midnight making a major demand

ठाकरेंच्या नेत्याचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

मुंबई तक

• 01:23 AM • 17 Jun 2026

follow google news

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदार फुटून वेगळा गट स्थापन करण्याच्या चर्चा रंगत असतानाच उद्धव ठाकरे गटाने मोठी आणि महत्त्वाची राजकीय चाल खेळली आहे. संभाव्य फुटीच्या वृत्तांना पार्श्वभूमी असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत निवेदन सादर करत संसदेतील पक्षाच्या मान्यतेबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

विशेष म्हणजे, काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला असतानाच मध्यरात्री हे पत्र जारी करण्यात आले. त्यामुळे या पत्राकडे केवळ प्रशासकीय पत्रव्यवहार म्हणून नव्हे, तर संभाव्य राजकीय घडामोडींना दिलेले उत्तर म्हणून पाहिले जात आहे.

नेमकी काय आहे मागणी?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे केलेल्या निवेदनात संसदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी, अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर पक्षातून फुटून जाणाऱ्या किंवा वेगळा गट स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही गटाला स्वतंत्र ओळख, अधिकृत दर्जा, संसदीय सुविधा अथवा विशेषाधिकार देऊ नयेत, अशी स्पष्ट भूमिका पत्रात मांडण्यात आली आहे.

पक्षाने असेही नमूद केले आहे की, भविष्यात जर कोणत्याही गटाकडून स्वतंत्र मान्यतेची किंवा वेगळ्या गटाच्या दर्जाची मागणी करण्यात आली, तर त्यावर निर्णय घेण्यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जावी.

दहाव्या अनुसूचीचा उल्लेख

या पत्रातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधानातील दहाव्या अनुसूचीचा (Anti-Defection Law) उल्लेख. पक्षाने स्पष्ट केले आहे की, पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या सर्व घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा वापर करण्याचा अधिकार त्यांनी राखून ठेवला आहे.

याचा अर्थ, जर पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांनी पक्षविरोधी भूमिका घेतली किंवा वेगळा गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्याविरोधात पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईची शक्यता नाकारता येणार नाही.

अरविंद सावंत यांनी पाठवले पत्र

हे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवले आहे.

राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांनुसार, उद्धव ठाकरे गटातील काही खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने आगाऊ भूमिका घेत लोकसभा अध्यक्षांना अधिकृतपणे आपली बाजू कळवली आहे.

राजकीय संदेश काय?

राजकीय विश्लेषकांच्या मते, हे पत्र केवळ संसदीय प्रक्रियेचा भाग नसून पक्षातील संभाव्य बंडखोरी रोखण्याचा आणि पक्षाची अधिकृत भूमिका नोंदवून ठेवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भविष्यात कोणताही गट स्वतंत्र मान्यतेचा दावा करत असल्यास उद्धव ठाकरे गटाला घटनात्मक आणि कायदेशीर लढाईत आधार मिळू शकतो.

दरम्यान, खासदारांच्या संभाव्य फुटीबाबतच्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात कोणते राजकीय निर्णय घेतले जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः लोकसभा अध्यक्षांची भूमिका आणि संबंधित खासदारांची पुढील पावले महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतात.