मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी (6 ऑगस्ट) मुंबईतील एका विशेष कार्यक्रमात Gen Z पिढीशी संवाद साधताना विद्यार्थी आंदोलन, संवादाची गरज आणि नव्या पिढीबाबत आपले स्पष्ट मत मांडले. अलीकडील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी, "जर मला डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन," असे महत्त्वाचे विधान केले.
ADVERTISEMENT
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापराबाबत विचारलेल्या प्रश्नावर भागवत यांनी संयमित भूमिका घेतली.
ते म्हणाले, "हे का घडलं, याची कारणं समजून घेतली पाहिजेत. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं, यावर मी निश्चित मत व्यक्त करू शकत नाही." भागवत यांनी माध्यमांमधील विविध दाव्यांचाही उल्लेख केला. काही ठिकाणी आंदोलनात काही 'मॉड्यूल्स' असल्याच्या बातम्या वाचल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्या बातम्यांची सत्यता तपासलेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्वाधिक चर्चेत आलेले विधान करत म्हटले, "मला काय खरं, काय खोटं हे माहीत नाही. पण जर मला डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन." आता त्यांच्या याच विधानाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे.
पाहा मुलाखतीत मोहन भागवत नेमकं काय-काय म्हणाले...
प्रश्न: तुम्ही मान्य करता की, संवाद जर पहिल्यापासूनच सुरू झाला असता तर हा विषय वाढलाच नसता.
मोहन भागवत: जे नाही व्हायला हवं ते जेव्हा घडतं तेव्हा कुठे ना कुठे चूक झालेली असते म्हणूनच ते घडतं. कोणाची चूक आहे, काय चूक आहे ही वेगळी गोष्ट आहे. पण कमतरता, उणीव राहिली हे नक्की. पण ती कमतरता देखील भरून काढली जाईल, केली पाहिजे असं मी मानतो.
हे ही वाचा>> राहुल गांधींच्या शेजारी उभी राहून महाराष्ट्राच्या रिया अहीरची दिल्लीतून डरकाळी!
प्रश्न: आंदोलन केल्यानंतर देशद्रोही वैगरे बोललं जातं...
मोहन भागवत: जर Gen Z आंदोलन करत असेल तर ते राष्ट्रविरोधी नाहीत. ते आपलेच लोकं आहेत, ती आपलीच पुढची पिढी आहे. मी म्हटलं ना.. संवादासोबत एक आपलेपणा देखील हवा. तेव्हाच एकमेकांच्या गोष्टी आपल्याला समजू शकतात. Gen Z वैगरे हे राष्ट्रविरोधी आहे असं मी मानत नाही.
मला वाटतं की, ही जी नवी पिढी आहे जी Gen Z, Gen Alpha.. या आता असलेल्या सध्याच्या पिढीपेक्षा खूप जास्त प्रामाणिक आहेत. देशभक्ती आणि सेवा याबाबत त्यांना प्रामाणिक आवाहन केलेलं आवडतं.
हे ही वाचा>> शिरसाटांना शिंदेंनी खडसावलं? ‘त्या’ भेटीवरून भाजपही नाराज?
प्रश्न: आंदोलनात जी मुलं निष्पाप आहेत त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो. पेलेट गन चालवल्या गेल्या. तुम्हाला काय वाटतं याबाबत
मोहन भागवत: या ज्या गोष्टी आहेत.. हे का झालं याची कारणं आपल्याला जाणून घेतली पाहिजेत. पण त्यासाठी जी माहिती हवी आहे ती माझ्याकडे नाही. तुमच्याकडे देखील ती माहिती पूर्ण नसेल असं मला वाटतं. पण हे पाहून कुठे गडबड आहे हे ठरवावं लागेल.
मी आता हे नाही म्हणू शकत की काय झालं, कसं झालं वैगरे.. खरं-खोटं मलाही माहीत नाही. तुम्ही देखील वाचूनच मला सांगत आहात आणि मी देखील तुम्हाला तसंच सांगत आहे. मी आज सकाळी वाचलं की, काही मोड्यूल्स त्यात होते आणि त्यांचा भांडाफोड झाला अशा बातम्या वाचत होतो. आता हे पण किती खरं, किती खोटं ते मला माहीत नाही. पण जर मला डोळे बंद करून विश्वास ठेवायला सांगितलं तर मी Gen Z वर विश्वास ठेवेन.
ADVERTISEMENT












