संजय राठोडांनी हात झटकले, गर्दीतील 10 हजार जणांवर गुन्हा दाखल

वाशिम: महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्या तब्बल 10 हजार समर्थकांविरूद्ध वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी मात्र हा प्रकरणी आपले हात झटकले आहेत. संजय राठोड यांचे हजारो समर्थक हे पोहरादेवी येथे आले होते. याप्रकरणी आता वाशिम जिल्ह्याचे एसपी वसंत परदेशी यांनी 10 हजार लोकांविरूद्ध 188 […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:20 AM • 24 Feb 2021

follow google news

वाशिम: महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्या तब्बल 10 हजार समर्थकांविरूद्ध वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी मात्र हा प्रकरणी आपले हात झटकले आहेत. संजय राठोड यांचे हजारो समर्थक हे पोहरादेवी येथे आले होते. याप्रकरणी आता वाशिम जिल्ह्याचे एसपी वसंत परदेशी यांनी 10 हजार लोकांविरूद्ध 188 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे वाचलं का?

याबाबत एसपी परदेशी म्हणाले की, ‘पोहरादेवीकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त असूनही लोक शेतातून व जंगलातून पोहरादेवीला पोहचले. लोकांना येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पोहरादेवी संस्थानच्या सदस्यांसोबत मीटिंगसुद्धा घेतली होती.’

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड हे वादाच्या भोवऱ्यात आले होते. जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून संजय राठोड हे जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी म्हणजे काल (23 फेब्रुवारी) त्यांनी पोहरादेवी येथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं होतं. मात्र, यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं होतं. संजय राठोड यांच्या हजारो समर्थकांनी पोहरादेवी येथे गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी याच गर्दीतील 10 हजार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, असं असलं तरी संजय राठोड यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.

ही बातमी देखील पाहा: मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन संजय राठोडांनी का धुडकावलं?

संजय राठोडांनी झटकले हात

पोहरादेवी येथे जी गर्दी झाली याबाबत स्पष्टीकरण देताना संजय राठोड यांनी आपले हात झटकले आहेत. ते असं म्हणाले की, ‘नक्कीच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची काळजी आहे. पोहरादेवी येथे लोक स्वतःहून आले होते. मी स्वतः गर्दी न करण्याचं, मास्क घालण्याचं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं होतं. मी 10 दिवसाच्या खंडानंतर या ठिकाणी आलो होतो. पण त्यापूर्वी मीडियामध्ये ज्या बातम्या आल्या त्यामुळे याठिकाणी लोकांनी गर्दी केली.’ असं म्हणत संजय राठोड यांनी आपण गर्दीला जबाबदार नसल्याचं म्हणत या प्रकरणी हात वर केले आहेत.

..तर संजय राठोडांनी दौरा रद्द का नाही केला?

संजय राठोड म्हणत असले की, गर्दी करु नका मात्र असं आवाहन जरी त्यांनी लोकांना केलं होतं तरी एक प्रश्न हा पुन्हा-पुन्हा उपस्थित होतो की, कोरोनाचं संकट थैमान घालत असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार आवाहन करुन देखील संजय राठोड यांनी आपला पोहरादेवीचा दौरा रद्द का केला नाही? जर त्यांनी आपला हा दौरा रद्द केला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालीच नसती. त्यामुळे आता ठाकरे सरकारने ज्या प्रमाणे १० हजार जणांविरोधात जो गुन्हा दाखल केला आहे तसाच कारवाईचा बडगा ते आपले मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात उगारणार का?

    follow whatsapp