काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे कुणाकडे येणार? पुढचा काँग्रेसध्यक्ष बिगर गांधी असेल की, पुन्हा गांधी घराण्याकडेच काँग्रेसची धुरा जाईल, अशा चर्चा सुरू आहेत. राहुल गांधी निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा होतेय. यावर स्वतः राहुल गांधीनींच उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार की नाही, हे लवकरच होणाऱ्या निवडणुकीत कळेल.”
‘तुम्ही निवडणूक लढवणार आहात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ती तुम्ही नाकारत नाही आहात’, असा प्रतिप्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, ‘मी निर्णय घेतलेला आहे आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
भारत जोडो यात्रा भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात -राहुल गांधी
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) लक्ष्य केलं. भाजपची आणि आरएसएसची विचारधारा द्वेष पसरवणारी आहे. आमची ही यात्रा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या याच विचारधारेविरोधात आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले, “प्रत्येकाचं स्वतःची एक भूमिका असते. भाजपची भूमिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही भूमिका आहे. त्यांच्या विचारांचं स्वागतच आहे. लोकांशी जोडण्यासाठी आमची ही यात्रा आहे. भाजपच्या विचारधारेनं जनतेचं जे नुकसान केलं आहे. ते भरून काढण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू केली आहे. भाजप आणि आरएसएसची विचारधारा तिरस्कार पसरवणारी आहे”, असं म्हणत राहुल गांधींनी आरएसएस आणि भाजपवर टीका केली.
आमची लढाई फक्त राजकीय पक्षाशी नाही, तर सर्व संस्थांशी; राहुल गांधींची भाजपवर टीका
राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेसचा सदस्य म्हणून मी या यात्रेत सहभागी झालो आहे. ही यात्रा भारताला जोडण्यासाठी आहे. जर याचा फायदा काँग्रेसला होत असेल, तर ठीक आहे.”
“भाजपने सर्व संस्थांवर ताबा मिळवला आहे. ते संस्थांवर दबाव टाकत आहे. सगळ्यांना माहितीये की कशा पद्धतीने काम सुरू आहे. आम्ही फक्त राजकीय पक्षाविरुद्ध लढ नाहीये, तर आम्ही सर्व संस्थांशी लढत आहोत. माध्यमे विरोधकांसोबत नाहीत. अनेक लोक ही लढाई लढू इच्छित नाहीत, कारण त्यांना भाजपविरोधात अडकण्याची इच्छा नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.
ADVERTISEMENT