दिवाळीनंतरचा बॉम्ब काय? देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई तक

• 05:53 PM • 08 Nov 2021

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता म्हणजेच ९ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आर्यन खान प्रकरणावरून NCB वर आणि भाजपवर नवाब मलिक यांनी विविध […]

Mumbaitak
follow google news

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता म्हणजेच ९ नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आर्यन खान प्रकरणावरून NCB वर आणि भाजपवर नवाब मलिक यांनी विविध आरोप केले. त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद असणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे वाचलं का?

नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेल्या भाजप कार्यालयात 9 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

1 नोव्हेंबरला काय म्हणाले होते फडणवीस?

‘दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आवाज नवाब मलिक आणत आहेत. ते कोणत्या मानसिकतेत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. जो फोटो त्यांनी ट्वीट केला आहे, त्याबद्दल रिव्हर मार्चच्या लोकांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे. ती व्यक्ती क्रिएटिव्ह टीमने हायर केलेली होती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. चार वर्षांपूर्वीचा फोटो आज सापडला आहे. ही संघटना नदी पुनरुज्जीवनाचं काम करते. त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जोडलो गेलो होतो. त्यावेळी हे फोटो काढलेले आहेत. सगळ्यांसोबत फोटो काढलेले आहेत. मलिक यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला. यापाठीमागे त्यांची मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे. यासंदर्भात रिव्हर मार्चवाल्यांनीच त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते लोक रिव्हर मार्चवाल्यांसोबत आलेले होते. त्यांच्याशी आमचा दुरान्वयानेही संबंध नाही’

नवाब मलिकांनी काय अरोप केला होता?

‘देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत. फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे याच शहरात राहतो. ज्याला भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती. पोलिसांच्या बदल्याही तो ठरवायचा. देवेंद्र फडणवीस जेव्हाही नवी मुंबई, पुण्याकडे जायचे, सायंकाळी ते त्यांच्या घरी हजेरी लावायला जायचे. तिथूनच फडणवीसांचा सर्व मायाजाल चालायचा. सरकार बदलल्यानंतर राज्यात ज्या कुठल्या केंद्रीय संस्था आहेत त्यामध्ये हाच फडणवीसांचा वाझे सर्व कार्यालयात फिरताना दिसत आहे’, असा खळबळजनक आरोप मलिकांनी केला होता.

आता या सगळ्या आरोपांना उत्तर देण्यासोबतच देवेंद्र फडणवीस नेमका कोणता बॉम्ब फोडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी बारामतीच्या दौऱ्यात फडणवीसांनाही टोला लगावला होता की बॉम्ब फोडा पण आवाज येऊ द्या नुसता धूर नको. याचं उत्तर फडणवीस देणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp