उद्धवजी तुमचं अर्ध मंत्रिमंडळ जेलमध्ये गेलं असतं: फडणवीस

नागपूर: जर आमच्याशी भिडायचं असेल तर ईडी आणि सीबीआयच्या आडून नाही तर थेट समोरासमोर येऊन भिडा असं आव्हानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यांच्या याच आव्हानाला आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘जर पंतप्रधान मोदींनी एजन्सींचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे आत जेलमध्ये असतं. पण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:09 AM • 16 Oct 2021

follow google news

नागपूर: जर आमच्याशी भिडायचं असेल तर ईडी आणि सीबीआयच्या आडून नाही तर थेट समोरासमोर येऊन भिडा असं आव्हानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलं होतं. त्यांच्या याच आव्हानाला आता भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ‘जर पंतप्रधान मोदींनी एजन्सींचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे आत जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.’ असं फडणवीस यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

ईडी-सीबीआय यावर नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘ई़़डी आणि सीबीआय या संदर्भात ते बोलले.. ईडी-सीबीआय का येतेय.. ती आम्ही नाही आणली.. ती उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी आणली. याचं कारण काय आहे.. तर माननीय उद्धवजी ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात ते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा याची इतिहासात नोंद होईल.’

‘या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे वसुली.. शेतकऱ्याला मदत करायची तर या सरकारजवळ पैसे नसतात. बांधावर जाऊन आश्वासनं द्यायची आणि त्यानंतर सपशेल पाठ दाखवायची. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करतो म्हणून सांगायचं आणि त्यानंतर पाठ दाखवायची. काहीही कारणं सांगायची. त्यामुळे या ठिकाणी ईडी-सीबीआय याकरता आली की, जो भ्रष्टाचार चाललेला आहे.’

‘मला तर असं वाटतं की, राज्याचे प्रमुख म्हणून याठिकाणी आयटी विभागाच्या रेडमधून जे त्यांनी सांगितलेलं आहे ते पाहता तुम्हाला झोपच यायला नको. राज्यामध्ये प्रचंड अशी दलाली चालली आहे. खरं म्हणजे दलाली आता या स्तरावर पोहचली आहे की, आयटीच्या रेडमध्ये असं लक्षात येत आहे की, काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे.’

‘त्यामधून अलर्ट घेतले जात आहेत कोणाकडून किती वसुली करायची आहे ते. हे याठिकाणी जर चालत असेल तर या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ईडी-सीबीआय येणारच आहे. त्यामुळे ईडी-सीबीआय याचं भय कुणाला असेल तर ज्यांनी या ठिकाणी काही केलं असेल त्याला भय असेल.’

उद्धवजी राणे, राज ठाकरेंना शिवसेनेतून का बाहेर जावं लागलं?, फडणवीसांचा तिखट सवाल

‘मी तर अतिशय स्पष्टपणे सांगतो पंतप्रधान मोदीजी एजन्सीच्या वापराच्या पूर्णपणे विरोधात आहेत आणि ते कधीही एजन्सीचा गैरवापर करु देत नाहीत. ते एजन्सीच्या कामामध्येही येत नाहीत आणि ते एजन्सीचा कधी राजकीय वापरही करत नाहीत. जर एजन्सींचा वापर केला असता तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ हे आत जेलमध्ये असतं. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोकं आहोत.’

‘जसं मागच्या काळात काँग्रेस आणि त्याच्या सोबतच्या पक्षाने एजन्सीचा दुरुपयोग केला तसा दुरुपयोग आम्ही कधीच करणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे. भ्रष्टाचार खणून काढल्याशिवाय मोदीजी स्वस्थ बसणार नाहीत.’ अशी प्रतिक्रिया यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

    follow whatsapp