अमरावतीत लॉकडाऊन, पालकमंत्री यशोमती ठाकूरांची घोषणा

मुंबई तक

• 04:41 PM • 21 Feb 2021

अमरावती: अमरावती शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता… आता पुन्हा एकदा अमरावती शहर आणि अचलपूर शहर येथे उद्यापासून (22 फेब्रुवारी) लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. हा लॉकडाऊन आठवडाभर असणार आहे. अशी माहिती यशोमती ठाकूर […]

Mumbaitak
follow google news

अमरावती: अमरावती शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता… आता पुन्हा एकदा अमरावती शहर आणि अचलपूर शहर येथे उद्यापासून (22 फेब्रुवारी) लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याची घोषणा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन लागू होणार आहे. हा लॉकडाऊन आठवडाभर असणार आहे. अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

अमरावतीमध्ये कोरोनाबाबतची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडू लागल्याने आता येथे आठवडाभरासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘आपल्याला आज नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागत आहे. उद्या रात्री 8 वाजेपासून हा लॉकडाऊन लागू होणार आहे. कारण आता तेवढा एकच पर्याय आमच्याकडे शिल्लक राहिला आहे. साधारण सात दिवसासाठी हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तू आणि एमआयडीसी सुरु राहणार आहेत. याव्यतिरिक्त सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर हे कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. सध्या प्रशासनाला कठोर राहावं लागणार आहे कारण त्याशिवाय पर्याय नाही.’ असं यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या.

अवश्य वाचा – राज्यात पुन्हा लॉकडाउनचे संकेत? मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार

आज सकाळीच यशोमती ठाकूर यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत

‘येत्या काही दिवसांमध्ये नागरिकांनी जर नियमांचं पालनं केलं नाही तर शहरात लॉकडाउनशिवाय पर्याय उरणार नाही.’ असे संकेत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ठाकूर यांनी लोकांकडून त्रिसूत्रीचं पालन केलं जात नसल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. ‘घराबाहेर पडताना मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजरने स्वच्छ हात धुणं हे अत्यंत गरजेचं आहे. याच नियमांचं पालन न केल्यामुळे अमरावतीकरांवर ही वेळ आलेली आहे. भविष्यातही असाच निष्काळजीपणा राहिला तर लॉकडाउन करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.’ ठाकूर यांनी स्पष्ट केलं होतं.

अवश्य वाचा – धक्कादायक ! अमरावतीमधील ६० टक्के परिसर कोरोनाबाधित

दरम्यान, अमरावती शहरात रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ होत असून शहराचा ६० टक्के भाग हा कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी मुंबई तक शी बोलताना दिली. अमरावती शहरात ३६ तासांचं विशेष लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असून जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. गेल्या दहा दिवसांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असून शनिवारी अमरावतीमध्ये नव्याने 727 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. गेल्या वर्षापासून जिल्ह्यातला हा सर्वाधिक आकडा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. शनिवारी अमरावतीत सात जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत…त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.

    follow whatsapp