गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न चांगलाच गाजला होता. खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दुरावस्था, अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी यामुळे प्रवासी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करत होते. अखेरीस ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर येत उपाययोजना आखण्याकडे भर दिला आहे.
ADVERTISEMENT
ठाणे शहराच्या वेशीबाहेर अवजड वाहनांच्या नियमनासाठी पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासाठी जागांची निश्चीती करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी उरण, खारेगाव, दापोडी, भिवंडी या भागाचा दौरा करुन जागांची पाहणी केली.
‘असं बिलकुल चालणार नाही!’ खड्डे पडलेल्या रस्त्यावरच एकनाथ शिंदेनी अधिकाऱ्यांची घेतली शाळा
आज झालेल्या पाहणी दौऱ्यात शहराबाहेर अडवून ठेवलेली अवजड वाहनं ठरलेल्या वेळेप्रमाणे नियमन करुन सोडण्याचं निश्चीत झालं आहे. उरण-जेएनपीटी मधून निघणारी वाहने मोठ्या प्रमाणात ठाणेमार्गे गुजरातला रवाना होत असल्यामुळे सिडकोच्या हद्दीतील मोकळ्या जागांचा आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्या दरम्यान राजदान फाटा परिसरातील १०० हेक्टर जागा सपाटीकरण करुन घेण्याचे आदेश शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. याचसोबत JNPT च्या वतीने निर्यातीसाठी म्हणजेच सेंट्रलाईज फ्रेट सेंटर मधून बाहेर पडणाऱ्या गाड्यांना विविध रंगाचे स्टिकर्स लावून त्यांचं नियमन सिडको, JNPT, नवी मुंबई पोलीस आणि रायगड पोलिसांद्वारे करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सर्व यंत्रणांची एक एकत्रित टीम तयार करुन ही सर्व वाहने रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत सोडण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. याव्यतिरीक्त शिंदे यांनी ठाणे महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या खारेगाव टोलनाक्याच्या दोन्ही बाजूच्या जमिनीची पाहणी करुन शक्य तेवढ्या जागेचं सपाटीकरण करण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर सोनाळे, दापोडा, मनोर-भिवंडी मार्गावर पार्किंग लॉटच्या संभाव्य जागांची पाहणी केली. हे प्लॉट तयार झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरात लवकप सुटून नागरिकांना त्याचा फायदा मिळेल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.
ADVERTISEMENT