महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच भेट घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातही एक बैठक पार पडल्याची बातमी समोर आली. त्यानंतर आता या चर्चा सुरू झाल्या आहेत की भाजप आणि मनसेची युती खरंच शक्य आहे का? तसंच हे झाल्यास मनसेला किती फायदा होईल किंवा भाजपला किती फायदा होईल या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
मनसे आणि भाजप यांची युती झाली तर भाजपचा फायदा काय?
मुंबईत शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेत एक शिंदे गट आणि दुसरा ठाकरे गट असे दोन गट पडले आहेत. ठाकरे आणि मुंबई हे समीकरण खूप जुनं आहे. ते सहजासहजी मोडायचं असेल तर आणखी एक ठाकरेच पर्याय म्हणून दिले तर भाजपला त्याचा फायदा निश्चितपणे होऊ शकतो. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मनसेची युती झाली तर शिवसेनेची आत्ताची जी अवस्था आहे त्यामुळे जी स्पेस मोकळी झाली आहे ती स्पेस भरून काढण्याचं काम आणि चांगला पर्याय देण्याचं काम राज ठाकरे करू शकतात. तसंच ठाकरे आडनाव असल्याने आणि बाळासाहेब ठाकरे यांची छबी राज ठाकरेंमध्ये दिसत असल्याने त्यांच्या भूमिकांचा प्रभाव हा मतदारांवर पडू शकतो. अशात मुंबईत मोठी मजल मारायची असेल तर भाजप आणि मनसे युती हे चांगलं समीकरण असू शकतं.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा राज ठाकरे पुढे नेत आहेत हे दस्तुरखुद्द राज ठाकरे यांनी परवाच एका कार्यक्रमात जाहीर केलं. मला चिन्हाची गरज नाही. धनुष्यबाणाची गरज नाही. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा मी पुढे नेतो आहे मी विचारांनी श्रीमंत आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना आपण पर्याय म्हणून निश्चितपणे निवडले जाऊ शकतो हेच सांगायचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला आहे.
नेमकं आपल्या भाषणात काय म्हणाले होते राज ठाकरे?
वारसा कुठला असतो तर तो वास्तूचा नसतो तो विचारांचा असतो. कोण कुठल्या वास्तूमध्ये आहे त्यावरून वारसा ठरत नाही. वारसा विचारांचा पुढे घेऊन जावा लागतो. आमच्या शिवछत्रपतींनी जो विचार दिला तो पेशव्यांनी अटोक किल्ल्यापर्यंत नेला. अटोक किल्ला आत्ता पाकिस्तानात आहे. महाराजांचा विचार पोहचवला कुणी? पेशव्यांनी. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली होती? पेशव्यांच्या हातामध्ये संपूर्ण सत्ता होती. या पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपती नाही म्हणवून घेतलं. छत्रपती तेच, आम्ही त्यांचे नोकर असं त्यांचं म्हणणं होतं. छत्रपती तेच, गादी तीच फक्त त्यांचा विचार पोहचवतो आहोत.
माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय? मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहेत. सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडे ती म्हणजे हे विचार. बाकीचं सगळं सोडा पण विचारांच्या बाबतीत मी श्रीमंत आहे. या महाराष्ट्रात ज्या लोकांनी, ज्या महापुरूषांनी जे विचार पेरले ते ऐकणं, बोध घेणं ही गोष्ट प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. असं वक्तव्य राज ठाकरे यांनी नुकतंच केलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अजेंडा काय सांगतो?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेनेत झालेल्या बंडाचा फायदा घेणार यात काहीही शंकाच नाही. त्यांचा अजेंडा हेच सांगतो आहे. महाराष्ट्रात राजकीय बंड होण्याच्या दोन महिने आधीपासून राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा नारा दिला. मशिदींवरच्या भोंग्याच्या प्रश्न समोर आणला. तसंच त्यावर आपण मार्ग काढू शकतो हे देखील दाखवून दिलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा त्यांच्यावर सूचक आणि खोचक शब्दांमध्ये टीकाही केली. उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात कशी चूक केली? हेदेखील गुढीपाडव्यापासून उत्तर सभांपर्यंतच्या भाषणांमध्ये त्यांनी सांगितलं.
शिवसेनेने जे हिंदुत्व सोडल्याची टीका त्यांच्यावर भाजपकडून सातत्याने केली जाते आहे. अशात हिंदुत्वाची ही स्पेस भरून काढण्यासाठी राज ठाकरे पुढे सरसावले आहेत. राज ठाकरे यांचं राजकारणातलं टायमिंग अफाट आहे. आत्ताच्या घडीला हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून आपण एक सक्षम पर्याय ठरू शकतो हे राज ठाकरेंनी दाखवून दिलं आहे. तसंच वारसा विचारांचा असतो आणि तोच वारसा आपण पुढे नेत आहोत हे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना आपला पर्याय असू शकतो हेदेखील सांगितलं आहे.
भाजपला युतीतून काय साध्य करता येईल?
शिवसेना दुभंगली आहे त्यामुळे भाजपचा आपसूकच फायदा झाला की त्यांची सत्ता आली. भले देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं असेल किंवा भाजपच्या नेत्यांना खास पदं मिळाली आणि शिंदे गटाला कमी महत्त्वाची पदं मिळाली असतील पण भाजपने महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचं काम एकदम परफेक्ट केलं. हिंदुत्वाचा दावा भाजपने मागची अडीच वर्षे तर केलाच होता तसाच तो यापुढेही ते करत राहतील. अशात महाराष्ट्रात एक चांगला मित्र हवा असेल तर राज ठाकरे हे त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. जी युती आणि जी कमिटेमेंट शिवसेनेसोबत होती त्याच कमिटमेंटने राज ठाकरेंसोबत जाणं हे हिताचं ठरेल. त्यामुळे मुंबई जिंकायची असेल आणि त्यात राज ठाकरेंचा करीश्मा चालला तर भाजपला हवाच आहे. शिवाय ठाकरे हे नावही भाजपला महाराष्ट्रात आणि मुंबईत लागणार आहे. मग ते राज ठाकरेंचं असेल तर उत्तमच असणार आहे.
राज ठाकरेंचा फायदा कसा होऊ शकतो?
मनसे या पक्षाची अवस्था कशी आहे ते अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. या पक्षाला नवसंजीवनी मिळायची असेल तर त्यांना चांगल्या मित्राची आवश्यकता आहेच. शत्रूचा शत्रू तो मित्र या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरेंचा शत्रू भाजप झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत जाऊन युती करणं हे कायमच मनसेच्या फायद्याचं ठरणार आहे. याशिवाय उद्धव ठाकरे टाळी देण्याच्या नावाखाली कसा दगा करतात याची चांगली जाणीव राज ठाकरेंना आहे. त्यामुळे तूर्तास तरी भाजपसोबत वाटचाल करणं हे राज ठाकरेंच्या आणि पर्यायाने मनसेच्या हिताचं ठरणार आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अशी चर्चा आहे. हे दोघे भेट नाकारत असले तरीही ही भेट झाल्याचं म्हटलं जातं आहे. दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यातही भेट झाली आहे. या भेटीगाठी वाढणं. त्यांच्या चर्चा होणं हे दोन पक्ष एकमेकांच्या जवळ येत असल्याचे संकेत आहेत. हिंदुत्वाच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या उत्तम प्रादेशिक पक्षाचा पर्याय म्हणून मनसे उभा राहू शकतो हे भाजपला चांगलं ठाऊक आहे. या दोन पक्षांची युती होणार की नाही हे चित्र येत्या काळात स्पष्ट होईलच मात्र जर ही युती झाली तर फायदा दोघांचाही होईल यात काहीही शंका नाही.
ADVERTISEMENT