“पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांची चौकशी करा”; अतुल भातखळकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई तक

20 Sep 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:46 AM)

संजय राऊत अटकेत असलेल्या पत्राचाळ प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नावं आलं आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल […]

Mumbaitak
follow google news

संजय राऊत अटकेत असलेल्या पत्राचाळ प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ईडीने दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नावं आलं आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. त्यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवार यांची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांकडे पत्र लिहून तशी मागणी केली आहे.

हे वाचलं का?

आमदार भातखळकर यांनी काय केलीय मागणी?

मराठी माणसाला बेघर करणाऱ्या पत्राचाळीच्या भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात यावे, याकरिता तात्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीला तात्कालीन मुख्यमंत्री उपस्थित होते. त्यामुळे मराठी माणसाला बेदखल करण्याच्या या कारस्थानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा संजय राऊत आणि शिवसेनेबरोबर काय संबंध होता? याची संपूर्ण चौकशी कालबद्ध मर्यादेत करावी, अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.

या संदर्भात भातखळकर यांनी तात्कालीन गृहनिर्माण सचिवांचे विश्लेषण करणारे पत्र दिलेले आहे. पुढे ते म्हणतात, या पत्रावरून हे स्पष्ट होते की, म्हाडा जरी प्राधिकरण असले तरी म्हाडा अधिकाऱ्यांवर निर्णय घेत असताना बाह्य शक्तींचा दबाव होता. त्यामुळे या चौकशीच्या प्रकरणाचे धागेदोरे हे दूरवर म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपर्यंत जात आहेत. मराठी माणसाला न्याय देण्याकरिता आणि त्यातील खरे सत्य बाहेर येण्याकरिता या संदर्भातील उच्चस्तरीय कालबद्ध मर्यादेची चौकशी करावी, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे

२००६-०७ मिटिंगचा काय संदर्भ आहे?

२००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हा केंद्रीय कृषी मंत्री असलेल्या शरद पवारांसोबत झाली होती. तर एक बैठक माजी मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती. यानंतर या प्रकरणात राकेश वाधवानचा सहभाग स्पष्ट झाला. पत्राचाळ डेव्हलपमेंट संदर्भात हा सहभाग होता.

२००६-०७ च्या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. तसंच २००७ मध्ये विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. या दोघांचीही नावं ईडीच्या चार्जशीटमध्ये आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे की ईडीच्या आरोपपत्रात ही दोन नावं का आली? तसंच शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतरच वाधवान हे या सगळ्यामध्ये कसे आले हे समोर आलंय.

    follow whatsapp