मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामना या वृत्तपत्राच्या संपादक रश्मी ठाकरे यांचीही कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली आहे. रश्मी ठाकरे सध्या वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
होळी साजरी करु नका, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आदेश
एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना महाविकास आघाडी सरकार सध्या अडचणीत सापडलं आहे. अँटेलिया बाहेरील स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी विरोधक उद्धव ठाकरे सरकारला कोंडीत पकडत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सरकारवर वारंवार आरोपांची राळ उठत असताना मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन याबद्दल आपलं मत मांडलेलं नाहीये.
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा पार पडलं तेव्हा त्या अधिवेशनात एपीआय सचिन वाझे यांच्यावर बरेच आरोप झाले. अँटेलिया केस, मनसुख हिरेन या सगळ्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ या अधिवेशनात पाहण्यास मिळाला. मात्र सभागृहात एवढं सगळं प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे का आले नाहीत हा प्रश्न सभागृहातही उपस्थित करण्यात आला.
मात्र अधिवेशन संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना सचिन वाझे प्रकरणाबाबत विचारलं असता, होय त्यासंबंधी तपास सुरू आहे. आधी फाशी द्यायची आणि मग कारवाई करायची ही काही आमची पद्धत नाही. सचिन वाझे हे काही ओसामा बिन लादेन नाहीत असं म्हटलं होतं. त्यांचं जर हे वक्तव्य सोडलं तर त्यानंतर सचिन वाझे प्रकरण असो किंवा परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब असो ते कशावरच भाष्य करत नाहीत असंच दिसून आलं.
सचिन वाझे ठाकरे सरकारचे वसुली अधिकारी- देवेंद्र फडणवीस
शरद पवारांची पत्रकार परिषद पण उद्धव ठाकरेंचं मौन कायम
अधिवेशनाचं सूप वाजल्यानंतर इतक्या सगळ्या घडामोडी घडल्या तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांतच होते. रविवारी म्हणजेच २१ मार्चला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत असं वक्तव्य केलं. तसंच परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे आणि त्यात केलेले आरोप हे बदली होण्याच्या आधी का केले नाहीत? असाही प्रश्न विचारला. शरद पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर रविवारचा संपूर्ण दिवसभर चर्चा रंगली ती अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची. महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाईल अशाही शक्यता वर्तवल्या गेल्या. त्यानंतर त्याच दिवशी रात्री राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक संपली आणि परमबीर सिंग यांनी केलेले आरोप निराधार आहेत असं सांगत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असं जयंत पाटील यांनी सांगितलं. परमबीर सिंग यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळा असल्याचंही त्यांनी म्हटलं आणि भाजपवरही आरोप केले.
ADVERTISEMENT