Malin: काळीज पिळवटून टाकणाऱ्या माळीण दुर्घटनेला 7 वर्ष पूर्ण, माळीणवासियांची ठाकरे सरकारला ‘ही’ विनंती

माळीण दुर्घटनेला 30 जुलै 2021 रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. दुर्घटनेपासून सतत चर्चेत राहिलेलं माळीण पुन्हा एकदा चर्चेत आलं ते रायगडमधील तळीयेमुळे. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख पुढे आली आहे आणि आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:51 AM • 30 Jul 2021

follow google news

माळीण दुर्घटनेला 30 जुलै 2021 रोजी 7 वर्ष पूर्ण होत आहेत. दुर्घटनेपासून सतत चर्चेत राहिलेलं माळीण पुन्हा एकदा चर्चेत आलं ते रायगडमधील तळीयेमुळे. राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नातून साकारलं गेलेलं आणि अल्पावधीत उभं राहिलेलं राज्यातलं पहिलं पुनर्वसन झालेलं स्मार्ट ग्राम म्हणून माळीणची नवी ओळख पुढे आली आहे आणि आता पुन्हा माळीण गावची चर्चा सुरू झाली आहे. याचनिमित्त एक विशेष रिपोर्ट.

हे वाचलं का?

30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगरकडा कोसळून मातीखाली गाडलं गेलं होतं. त्यामुळे अवघ्या माळीण गावावर शोककळा पसरली होती. पण त्यानंतर मदतीचे ओघ सुरु झाले. लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन माळीणला तात्पुरतं सावरलं. सुरवातीला जागा उपलब्ध न झाल्याने पाहिलं वर्ष वाया गेलं. पण जागा उपलब्ध झाल्यावर पुढील 3 वर्षात हे गाव वेगाने उभारलं गेलं आहे.

फोरजी आणि वाय-फायच्या गप्पा मारणारऱ्या आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या देशात या माळीण दुर्घटनेची बातमी अनेक तास झाले तरी ना मीडियाकडे पोहचली होती ना प्रशासनाकडे. त्यामुळे मदतही उशिरा पोहचली. या घटनेची माहिती तालुका प्रशासनापर्यंत पोहचवण्यासाठी येथून जाणाऱ्या एसटी बसची मदत घ्यावी लागली होती. आजही ती वेदनादायक घटना येथील गावकरी विसरलेले नाहीत. महाड मधील तळीये गावात घडलेल्या घटनेमुळे माळीणमधील नागरिकांच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

मधल्या काळात काहींची लग्न होऊन दोनाचे चार हात झाले. तर काहींच्या घरात पाळणाही हलला. या घटनेत वाचलेला सर्वात लहान असलेला रुद्र आता 7 वर्षाचा झाला आहे. या दुर्घटनेत रक्ताच्या नात्यांना मुकलेल्या ग्रामस्थांनी तब्बल पावणेतीन वर्ष ऊन, वारा व पावसाशी लढा देत आपल्या जिवलगांच्या विरहात पत्र्याच्या शेडमध्ये आपला संसार थाटला.

माळीण वासियांच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. मात्र नवीन घरात गृहप्रवेश केला तरी आपल्या जुन्या गावच्या आठवणी मात्र विसरणं शक्य नाही. माळीणप्रमाणे तळीयेचे पुनर्वसन व्हावं अस त्यांना वाटत.

माळीण पुनर्वसनासाठी जवळच्याच आमडे गावातील 8 एकर जागा खरेदी करण्यात आली होती. या जागेचे प्लॉटिंग करून घरांच्या बांधकामास सुरवात झाली आणि तीन वर्षात नवं माळीण उभारल गेलं. घरांसाठी ॲल्युफॉर्म शटरिंग टेक्निक वापरून 68 घरे उभारली गेली. प्रत्येकाला पाणी, वीज, शौचालय, बाग आदी सुविधांसह 1 बीएचके घर मिळाले आहे.

घर आणि रस्त्यांव्यतिरिक्त एक तलाठी कार्यालय शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, संरक्षक भिंत, सामूहिक जनावरांचा गोठा, अशा सुमारे 18 पायाभूत सुविधांनी सुसज्य आणि देखणे माळीण उभारले गेले आहे. मात्र या परिसरातील अजूनही अनेक गावे भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे या गावांमध्ये कोणतीही दुर्घटना होण्यापूर्वी योग्य ते पुनर्वसन व्हावं अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडीच्या दत्तात्रय सकट गुरुजीं आणि त्यांची पत्नी बेबीनंदा सकट यांच्या रंगकर्मी ग्रुपने कोणताही मोबदला न घेत आपल्या शाळेतील मुलांच्या मदतीने उत्कृष्ट स्वरूपाचे चित्र काम येथे केले आहे. ABCD ते मिकी माउसच्या रंगीबेरेंगी चित्रांनी शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या लागल्या आहेत. या सोबत गावच्या मुख्य भिंतींवर वारली पेंटिंगमुळे आदिवासी जीवनशैलीही जपली जात आहे. यामुळे गावचा आणि शाळेचा चेहरा मोहराच बदलला आहे.

नवीन माळीणच एकीकडे अप्रूप वाटत असलं तरी जुन्या आठवणी मात्र पुसल्या जाणार नाहीत यासाठी जुन्या गावठाणात स्मृतिस्थळ उभारलं गेलं आहे. वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने कमी वेळेत अतिशय सुंदर असं हे स्मृतिस्थळ उभारलं आहे. मात्र इथे येणारे पर्यटक सेल्फीच्या नादात इथलं पावित्र्य नष्ट करत आहेत. याबाबत गावकरी नाराज आहेत.

Raigad Landslide : रायगडमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मोदी सरकारकडून मदत जाहीर

एकीकडे माळीणचे पुनर्वसन होत असताना काही सामाजिक संस्थानी ग्रामस्थाच्या मानसिक आणि आर्थिक पुनर्वसनासाठी हात पुढे केला आहे. पुण्यातल्या सिटी कार्पोरेशनच्या वतीने महिलांना गोधडी प्रशिक्षण दिले. या महिला आता कामात स्वत:ला गुंतून घेत आहेत. येथील तरुणांना रोजगार वाढीसाठी तसेच प्रौढांना शेती व प्रक्रिया उद्योगावाचे प्रशिक्षण देणे गरजेचं आहे.