महंत सुनील महाराज यांच्या शिवसेना ठाकरे गट प्रवेशावर मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

• 02:49 PM • 30 Sep 2022

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. यासंदर्भात बंजारा समाजाचे नेते, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहेत, कोणी कुठे जायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे सांगत महंत यांना तसं वाटलं असेल म्हणून ते गेले असावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. […]

Mumbaitak
follow google news

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. यासंदर्भात बंजारा समाजाचे नेते, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहेत, कोणी कुठे जायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याचे सांगत महंत यांना तसं वाटलं असेल म्हणून ते गेले असावे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले आहेत संजय राठोड?

बंजारा समाजाचे अनेक महंत महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात जवळपास सव्वा कोटी बंजारा समाज आहे. सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे संत होते. त्यांच्या नंतर अनेक महंत आहेत. धार्मिक कार्यांमध्ये त्यांचं योगदान असतं. आमचे दोन महंत हे मुख्य काम पाहतात. आता महंत सुनील महाराज यांना जर ठाकरे गटाच्या शिवसेनेत जायचं होतं तर तो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. लोकशाहीने तो अधिकार त्यांना दिला आहे. त्यामुळे त्याबद्दल काय बोलणार असंही संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

महंत सुनील महाराजांना संजय राठोडांविरुद्ध देणार उमेदवारी?

महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, संजय राठोडांविरुद्ध निवडणूक लढवणार का? याला उत्तर देताना महंत सुनील महाराज म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हा निर्णय घेतील.’

उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं आहे?

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपण म्हणतो, साधू संत येती घरा, तोचि दिवाळी-दसरा. नवरात्रीमध्ये सुनील महाराज शिवसेनेत आलेत. केवळ ते एकटेच आलेले नाहीत. तर बंजारा समाजातला कडवट, लढवय्या सैनिकही आलाय. आम्ही त्यांना (संजय राठोड) न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा या सर्वांच्या लक्षात आलं की, ज्यांनी न्याय दिला. त्यांच्याच पाठीत वार केला. त्यांच्यासोबत (संजय राठोडांसोबत) आपण जाऊ शकत नाही. कारण सेवालाल महाराजाचा शिष्य असलेल्या बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाहीये. ते निष्ठेने शिवसेनेत आलेत. त्यांचं भविष्य घडवणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी पूर्णपणे घेतलीये. लवकरात लवकर मी महाराष्ट्रात फिरेनं. पोहरादेवीलाही जाईन’, असं ठाकरे म्हणाले.

जेव्हा ठाकरेंना महंत सुनील महाराजांना शिवसेनेत प्रवेश देऊन संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न होतोय का? असं विचारण्यात आलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शह देणं या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही. मला पुढे जायचं आहे. जे सोबत येतील, ते माझे आहेत. लढायच्या वेळी जे सोबत येतात, त्यांचं महत्त्व अधिक असतं. त्यामुळे एवढा मोठा समाज सोबत आल्यामुळे एखाद्या व्यक्तीला शह देणं शुल्लक गोष्ट आहे’, असं ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp