पश्चिम बंगालसह ५ राज्यांतील निवडणूकीची मतमोजणी आज पार पडत आहे. ज्यात आसाम चा अपवाद वगळता इतर सर्व राज्यांत स्थानिक पक्षांनी भाजपचं आव्हान मोडून काढत सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी भाजपचं आव्हान मोडून काढत सलग तिसऱ्यांदा सत्तेच्या दिशेने आगेकूच केली आहे. या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता दीदींचं अभिनंदन करत राज्याची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मितेचं महत्व तूम्ही समजू शकता असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ममता बॅनर्जींचं अभिनंदन करत असताना राज ठाकरे यांनी राज्यांच्या स्वायत्ततेसाठीचा आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेऊन पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी मी आशा करतो असं म्हटलं आहे. याचवेळी राज ठाकरे यांनी तामिळनाडूत विजय मिळवलेल्या द्रमुकच्या स्टॅलिन यांचंही अभिनंदन केलंय.
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही ममता दीदींचं कौतुक करत दीदी ओ दीदी…विजयाबद्दल बंगालच्या वाघिणीचं अभिनंदन अशा शब्दांत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी काय म्हणाले संजय राऊत?
भाजपच्या नियोजनाचं कौतुक केलं पाहिजे. कोरोना काळ होता तरीही देशाचे पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी गेले. देशाचे गृहमंत्री गेले. हे सगळं कौतुकास्पद आहे. मात्र पश्चिम बंगाल जिंकणार ममता बॅनर्जीच. कदाचित बहुमत थोडंसं कमी होईल.. मात्र सत्ता ममतांचीच येईल याचा विश्वास आम्हाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
राज्या राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री बंगालमध्ये गेले होते. भाजपला या सगळ्याचा नक्कीच फायदा होईल. संध्याकाळी जेव्हा संपूर्ण निकाल जेव्हा हाती येतील तेव्हा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री होतील याचा विश्वास वाटतो कारण बंगालमधून त्यांना हरवणं सोपं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
