अभिनेत्री कंगना रणौतला कोर्टाचा दणका, ‘तो’ खटला दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी फेटाळली

विद्या

• 05:20 PM • 31 Dec 2021

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. कंगनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या कोर्टावर आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत या कोर्टातील आपली प्रकरणं दुसऱ्या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. याआधी […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई सत्र न्यायालयानं दणका दिला आहे. कंगनाचा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानी प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या कोर्टावर आपला भरवसा नाही, असं स्पष्ट करत या कोर्टातील आपली प्रकरणं दुसऱ्या कोर्टापुढे वर्ग करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. याआधी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानंही कंगनाचा याबाबतचा अर्ज फेटाळून लावला होता. त्याच निर्णयाला कंगनानं मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं.

हे वाचलं का?

आपली बाजू न ऐकता बेकायदेशीरपणे या कोर्टानं आपल्याविरोधात अटक वॉरंट जारी केला. असा आरोप कंगनानं या अर्जातून केला होता. अंधेरी दंडाधिकारी कोर्टाविरोधातील ही मागणी फेटाळून लावताना सत्र न्यायालयानं कंगनाविरोधातील कारवाई कायदेशीर ठरवली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यु. बगाले यांच्यासमोर यावर सुनावणी पार पडली.

कंगनाच्या वतीनं अ‍ॅड. रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाच्यावतीनं अंधेरी कोर्टाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र याला जावेद अख्तर यांचे वकील भारद्वाज यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रत्येकवेळी नव्या सबबी सांगून निव्वळ कोर्टाचा वेळ फुटक घालवला जात असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिक या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या तिच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली होती. मात्र, या संवेदनशील प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना खोटे आणि आधारहीन आरोप कंगनानं आपल्यावर केले आहेत.

अभिनेत्री कंगना रणौतला ठार मारण्याची धमकी, कंगनाची पोलिसात धाव

यामुळे आपली विनाकारण बदनामी झाली असून आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. त्यामुळे कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली.

याप्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं कंगना रणौतला यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष सुनावणीला हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मात्र त्यानंतरही कंगना सातत्यानं गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात येईल असं बजावलं होतं.

जावेद अख्तर यांची तक्रार काय?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवर अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप केले. तसेच माझी विनाकारण बदनामी करणारी विधानं केली, असं जावेद अख्तर यांचं म्हणणं आहे. याच संदर्भात त्यांनी कंगनाविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला भरला.

    follow whatsapp