मुंबई: राज्यात आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होत आहे. सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 180 आमदारांनी मतदान केले आहे. मतदान सुरु असताना महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानला जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 2 आमदारांच्या मताचा फटका बसला आहे.
ADVERTISEMENT
काल (जून ९) पीएमएलए कोर्टाने परवनगी नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तिथेही दिलासा मिळालेला नाही. देशमुख यांच्या वकिलांनी माघार घेतली असून मलिकांची कायदेशीर टीम अजूनही काही होऊ शकते का यासाठी प्रयत्न करत आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी जर मतदान केले असते तर महाविकास आघाडीला त्याचा नक्कीच फायदा झाला असता.
आज सकाळपासून विधान भवनात मतदानाला सुरुवात झालेली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अपक्ष असे सर्वच आमदार एकापाठोपाठ एक मतदानासाठी येत आहेत. राज्यसभेत खरी लढत ही शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात आहे. सहावी जागा निवडणूक आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पाच वाजेपर्यंत विजयी उमेदवाराचे नाव समोर येईल.
दरम्यान 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख मागच्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्याचबरोबर जमीन घोटाळ्याप्रकरणी नवाब मलिकांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
ADVERTISEMENT
