सेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही, युतीच्या चर्चांना पूर्णविराम- संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सुनावलं

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही अनेकदा शिवसेना आणि भाजप हे दोन जुने मित्र पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘रोखठोक’ या सदरामधून या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेना आणि भाजप एकत्र येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 06:45 AM • 30 Jan 2022

follow google news

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही अनेकदा शिवसेना आणि भाजप हे दोन जुने मित्र पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतात. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या ‘रोखठोक’ या सदरामधून या चर्चांना पूर्णविराम देत शिवसेना आणि भाजप एकत्र येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारीला केलेल्या भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षाबाबत आपली ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाविकासआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे. भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना आता पूर्णविराम मिळाला आहे, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. या सदरात राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन टीका करणाऱ्या विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर अभद्र टीका करणाऱ्यांची तोंडे २३ जानेवारीला पूर्णपणे वाकडी झाली. उद्धव ठाकरे समोर आले व भाजपच्या मुखवट्यावरच हल्ला केला ! उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने संभ्रम दूर झाला. शिवसेना आणि भाजपचे ‘आतून काही सुरू आहे’ या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर भाजप नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. उद्धव ठाकरे कोठे आहेत? अशी शंका चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी उपस्थित केली. विरोधकांच्या सर्व ‘लघुशंका’ २३ जानेवारी रोजी त्यांच्यावरच उलटल्या, असा हल्ला राऊत यांनी चढवला आहे.

उद्धव ठाकरे यांचे भाषण व त्यानंतर फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील संभ्रम पूर्णपणे दूर झाला. ठाकरे व त्यांचे काही नेते भारतीय जनता पक्षाशी आतून संधान बांधून आहेत व सध्याचे सरकार ही तात्पुरती व्यवस्था आहे हे मळभ दूर झाले. आता एकत्र येणे शक्य नाही व फडणवीस यांच्या कडक भाषेतील उत्तराने कोणतीही खिडकी उघडी आहे असे दिसत नाही. आहे त्या स्थितीतच राज्य पुढे चालवले जाईल व भारतीय जनता पक्षाचा बराचसा वेळ यापुढे राजभवनाच्या परिसरातच जाईल, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

    follow whatsapp