दोघांच्या संसारात रोज खडखडाट व्हायचा, तिघांचा संसार उत्तम चालला आहे-संजय राऊत

मुंबई तक

• 10:25 AM • 02 Dec 2021

2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी त्यानंतर अस्तित्वात आलेलं सरकार हे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्षे तरी विसरणार नाही. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात उभा दावा निर्माण झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवसेना सत्तेत आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आणि शरद पवार […]

Mumbaitak
follow google news

2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी त्यानंतर अस्तित्वात आलेलं सरकार हे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्षे तरी विसरणार नाही. मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्यावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात उभा दावा निर्माण झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करून शिवसेना सत्तेत आली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. संजय राऊत आणि शरद पवार यांचा महाविकास आघाडी घडवण्यात सिंहाचा वाटा होता. आता संजय राऊत यांना तीन पक्षांबाबत विचारलं असता त्यांनी केलेलं वक्तव्य महत्त्वाचं आहे.

लोकमतच्या डिजिटल इन्फ्लूअन्सर अवॉर्ड सोहळ्यात संजय राऊत यांना एक प्रश्न विचारण्यात आला. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर शिवसेनेसमोर कोणता पर्याय असेल? असा तो प्रश्न होता. शिवसेना-राष्ट्रवादी, शिवसेना-काँग्रेस की शिवसेना-मनसे असे तीन पर्याय संजय राऊत यांना देण्यात आले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. ही अवस्था बदलणार नाही. आमचा संसार बरा चालला आहे. संसार मोडू नये या मताचा मी आहे. आधी दोघांचा संसार होता त्यात रोज खडखडाट व्हायचा. आता तिघांचा संसार उत्तम चालला आहे. कुणाचाही दृष्ट लागू नये.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, ममता बॅनर्जी या वाघीण आहेत. त्यांचे खूप चांगले प्रयत्न चालले आहेत. महाराष्ट्र वाघांचा आहे. त्यामुळे आगामी काळात वाघ-वाघिणीचं पुढे काय होतं बघू असं सांगत त्यांनी आगामी राजकारणाचेही संकेत दिले आहेत.

फडणवीस यांचं शिवसेनेला उत्तर

मला वाटतं शिवसेनेनं गुप्त भेटी, उघड भेटी काहीही करावं. त्याने अजिबात फायदा होणार नाही. 2024 ला पुन्हा एकदा मोदींजीच्या नेतृत्वात सरकार येणार. खरं तर शिवसेनेचे किती निवडून आले आहेत त्यांचे.. एवढ्या मोठ्या-मोठ्या बाता करतायेत. 56 निवडून आले आहेत 56. त्यांचा स्ट्राईक रेट काय होता.. पासिंग स्ट्राईक रेट होता. 40-42 टक्क्यांचा स्ट्राईक रेट होता. आमचा 70 टक्के आहे. त्यामुळे कोणाला महाराष्ट्रातील लोकांनी पळवून लावलं हे स्पष्ट आहे.

मला असं वाटतं की, संजय राऊत असेल शिवसेन असेल यांनी कितीही लांगुलचालन केलं तरी त्यांना फायदा होणार नाही. पण एक चांगलं आहे. आता मतांसाठी त्यांना हिंदुत्वविरोधी पक्षांना डोक्यावर घेऊन हिंडावं लागतं आहे. हा त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे.

    follow whatsapp