‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाचवेळा असं पत्र लिहिलं होतं’, भाजप प्रवक्त्याचं वादग्रस्त विधान

मुंबई तक

20 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:37 AM)

‘वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय. वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर […]

Mumbaitak
follow google news

‘वीर सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली. ब्रिटिशांकडून पेन्शन घेतली,’ या राहुल गांधींच्या विधानाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणातही उमटले. या विधानावरून राहुल गांधींना उत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यापाठोपाठ भाजप प्रवक्त्यानं केलेल्या विधानावरून काँग्रेसनं टीकास्त्र डागलंय.

हे वाचलं का?

वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला भाजपकडून प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. त्यातच आता भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानानं नव्या वादानं डोकं वर काढलंय. भाजपचे प्रवक्ते सुधाशू त्रिवेदी यांनी आज तक वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात हे विधान केलं.

वीर सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना सुधांशू त्रिवेदी म्हणाले, “सावरकरांनी माफी मागितली, हे जे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता माफीनाम्याची गोष्ट आहे, तर त्या काळात अनेक लोक बाहेर पडण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. त्याचा अर्थ काय?”, असं विधान सुधांशू त्रिवेदीनं केलंय.

भगतसिंह कोश्यारीचं वादग्रस्त वक्तव्य “छत्रपती शिवराय जुन्या काळातले आदर्श नितीन गडकरी आत्ताचे”

सुधांशू त्रिवेदींच्या या विधानामुळे भाजप टीकेचं धनी ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र काँग्रेसनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदींचा व्हिडीओ ट्विट करत सवाल केलाय.

“सकाळी राज्यपाल शिवछत्रपतींना जुन्या काळातले आदर्श म्हणून भाजपच्या नेत्याला नव्या काळातील आदर्श ठरवतात आणि दुसरीकडे भाजपचा राष्ट्रीय प्रवक्ता शिवछत्रपतींनी औरंगजेबाची माफी मागितली असे थेट वक्तव्य करतो. सावरकरांचा माफीनामा लपवायला भाजपचे बगलबच्चे अजून किती खालच्या पातळीला जाणार?”, असा सवाल काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलाय.

जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

सुधांशू त्रिवेदींच्या या विधानावरून आमदार जितेंद्र आव्हाडांनीही ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय. “शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं म्हणणारा ठार वेडाच असू शकतो… बोलणारा भाजप प्रवक्ता”, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय.

PM मोदींना माझी हात जोडून विनंती, कोश्यारींना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचंही छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल वादग्रस्त विधानं

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलेल्या विधानानं वाद सुरू झालाय. “आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत”, असं कोश्यारी म्हणाले होते.

    follow whatsapp