राजापूरमध्ये रिफायनरीवरून वातावरण तापलं, ग्रामस्थांचं रात्रभर जागरण आंदोलन?

मुंबई तक

• 06:25 AM • 09 Jun 2022

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे सोलगाव येथील ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यामुळे राजापूरमध्ये पुन्हा एकदा रिफायनरी विरोध तीव्र झाला आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरु असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखून धरला आहे. शिवणे खुर्दच्या माळरानावर सुरु असलेल्या सर्व्हेसाठी आलेल्या गाड्या देखील अडवून ठेवण्यात […]

Mumbaitak
follow google news

राकेश गुडेकर, प्रतिनिधी, रत्नागिरी

हे वाचलं का?

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे सोलगाव येथील ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यामुळे राजापूरमध्ये पुन्हा एकदा रिफायनरी विरोध तीव्र झाला आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी शिवणे खुर्द गावाच्या माळरानावर सुरु असलेला सर्व्हे रिफायनरी विरोधकांनी रोखून धरला आहे.

शिवणे खुर्दच्या माळरानावर सुरु असलेल्या सर्व्हेसाठी आलेल्या गाड्या देखील अडवून ठेवण्यात आल्या आहेत. इथं कामासाठी आणलेली हत्यारं देखील ग्रामस्थांनी ताब्यात ठेवली आहेत. आपल्या हक्काच्या जमिनीत सरकारकडून अनधिकृत सर्व्हे कसा सुरु आहे, असा आरोप करत जोपर्यंत अधिकृत कागदपत्रे दाखवली जात नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

राजापूरमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. एककिडे समर्थक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे विरोधकानीही आक्रमक भूमिका घेतली आहेत. याचाच प्रत्यय बुधवारपासून गोवळ-शिवणे माळरानावर येत आहे.

रिफायनरी प्रकल्पासाठी सध्या ड्रोन सर्वे , भू सर्वेक्षण सुरू आहे. मात्र हे सर्व बेकायदेशररित्या सुरू असल्याचा आक्षेप, तक्रारी जागा मालकांनी केल्या आहेत.

बुधवारी देखील दुपारच्या दरम्यान शिवणे खुर्द गावाच्या सड्यावर जमिनीत होल पाडून सँपल घेण्यासाठी गाडी सह ७-८ कर्मचारी आले होते. त्यावेळी तेथे काम करत असलेल्या शेतकरी ग्रामस्थांनी त्यांना हटकले. थोड्याच वेळात तेथे पूर्ण गाव जमा झाला. देवाचे गोठणे , गोवळ, सोलगाव येथून ग्रामस्थ ही येऊ लागले. यावेळीही कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र , सर्वेक्षण करण्यासंबंधी कागदपत्र काहीही नव्हते, व ते स्वतला एमआयडीसीचे कर्मचारी असल्याचं सांगत होते, त्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र , परवानगीचे पत्र नव्हते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

दरम्यान पोलिस यंत्रणा देखील त्यानंतर तेथे दाखल झाली. त्यावेळी ग्रामस्थांनी एसपीच आले पाहिजेत ही मागणी केली. तसेच जी काय कागदपत्र आहेत, ती इथेच दाखवा या मागणीवर ग्रामस्थ ठाम आहेत. एम आय डी सी चे अधिकारी उद्या राजापूर पोलिस स्थानकात येऊन भेट देतील असे सांगण्यात आले. परंतु त्यांनी गावातच आले पाहिजे अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी शिवणे खु. येथील सड्यावरच धरणे आंदोलन करायचे ठरवले. जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही , योग्य ती कागदपत्रे दाखवली जात नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केला. आणि रात्रभर गोवळ-शिवणे माळरानावर आंदोलन करण्यात आलं.

रिफायनरी विरोधी पोवाडे ,भजन करण्यात आलं. जवळपास चारेशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. आज सकाळी देखील हे आंदोलन सुरू आहे.

चुकीच्या पद्धतीने सुरू असलेलं काम हे लगेच थांबावलं गेलं पाहिजे, तसेच अधिकारी जोपर्यंत इथे येत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही अशी भूमिका बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नरेंद्र जोशी यांनी मांडली आहे..

    follow whatsapp