eknath shinde delhi visit cancel : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नियोजित दिल्ली दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे ते दिल्लीला जाणार नसून सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमाला ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या बदललेल्या कार्यक्रमामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या पुढील राजकीय बैठकींकडेही सर्वांचे लक्ष लागले असून, आज त्यांच्या मुंबईतील नंदनवन या निवासस्थानी महायुतीतील काही वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रेमासाठी धाडस केलं, पण फसला; प्रेयसीच्या घरात अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?
शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना सुरुवात
या बैठकीचे महत्त्व वाढण्यामागचे कारण म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी नंदनवन येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्याआधी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याने या सलग बैठका चर्चेचा विषय ठरल्या. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती.
हेही वाचा : आदित्य ठाकरे, रोहित पवार की श्रीकांत शिंदे राज्याचा तरुण मुख्यमंत्री कोण होईल? अंकशास्त्रज्ञांनी दिलं उत्तर
जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी 'त्या' चर्चा फेटाळल्या
मात्र, या सर्व चर्चांना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. दोन्ही नेत्यांनी या भेटींचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे सांगत चर्चा केवळ त्यांच्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांबाबत झाल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी नगरविकास विभागाशी संबंधित प्रलंबित विषय तसेच एका नगरपरिषद अध्यक्षांच्या अपात्रतेविरोधातील प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगितले. त्यामुळे या बैठकीचा सत्ताधारी आघाडीत प्रवेशाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांनीही या भूमिकेला दुजोरा देत, चार दशकांचा राजकीय अनुभव असलेला नेता अशा प्रकारच्या संवेदनशील राजकीय चर्चांसाठी उघडपणे सत्ताधारी नेत्यांच्या भेटी घेणार नाही, असे म्हटले. संबंधित नगरपरिषद अध्यक्षांच्या अपात्रतेच्या निर्णयाचा पाठपुरावा करण्यासाठीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कालच्या भेटीनंतर आज नंदनवन येथे महायुतीच्या काही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीकडे राज्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT












