तलवारीसोबत बाहेर गेलेले उद्योगही परत आणा : वडेट्टीवारांचा मुनगंटीवारांना खोचक सल्ला

मुंबई तक

• 09:18 AM • 11 Nov 2022

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. महाराष्ट्र सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधत आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. मुनगंटीवार यांच्या या घोषणेवर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक […]

Mumbaitak
follow google news

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमध्ये असलेली जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. महाराष्ट्र सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधत आहे, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. मुनगंटीवार यांच्या या घोषणेवर माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. तलवारीसोबत उद्योगही आणा असा खोचक सल्ला वडेट्टीवार यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले वडेट्टीवार?

माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “जगदंबा तलवार परत येत असेल तर आम्हालाही आनंद होईल. मात्र महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याने हजारो बेरोजगारांच्या हातचं काम गेलं. महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं. आता तलवार आणत असताना त्यासोबत उद्योगही आणा. बेरोजगाराच्या हातांना काम मिळणं हे ही तेवढचं महत्त्वाचं आहे.

उद्योग गेलेत. रोजगार बुडालेत. महाराष्ट्राचे प्रचंड नुकसान झाले. तो विषय बाजूला ठेवून केवळ भावनेचं राजकारण करण्यासाठी जगदंबा तलवारीच्या विषय पुढे केला. तुमचं राजकारण महाराष्ट्रातील तरुणांना कळतं आहे. तलवारी सोबत उद्योग जर आणलेत तर जनता तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवील, असे वडेट्टीवार म्हणाले.

मुनगंटीवार काय म्हणाले होते?

छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होताच महाराजांच्या विजयादशमीच्या पूजेसाठी वापरली जाणाऱ्या हिरे आणि रत्नजडीत जगदंबा तलवारीसाठी केंद्र सरकारला आम्ही विनंती केली.

महाराजांची ही तलवार इंग्रज मोहापोटी घेऊन गेले होते. पण त्या तलवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पावन स्पर्श झाला आहे. आमच्यासाठी ती जगातील साऱ्या संपत्तीपेक्षा अमुल्य आहेत. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत आहोत.

केंद्र सरकारला सांस्कृतिक विभागाच्या वतीने पत्रव्यवहार सुरु केला आहे. सोबतच ऋषी सुनक यांच्याशी याबाबत चर्चा करुन ही तलवार परत यावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

शिवराज्याभिषेकाला जून 2024 मध्ये 350 वर्ष पूर्ण :

जून 2024 मध्ये शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून मोठा आराखडा करत आहोत. या सर्व कार्यक्रमात जर जगदंबा तलवार आम्हाला ब्रिटनने दिली तर तो आमचा आनंदोत्सव हा निश्चितपणे उत्तम पद्धतीने करण्यात मदत होणार आहे. त्यामुळेच आम्ही जगदंब तलवार महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    follow whatsapp