चक्रीवादळ आणि परतीच्या पावसामुळे मराठवाड्यासह विदर्भातील शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. परतीच्या पावसामुळे मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून हातात आलेलं पीक वाया गेल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असताना उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. “पालकमंत्र्यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर घेतला जाईल. मी स्वतः याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बोलेन. वेळप्रसंगी आम्ही कर्ज काढू पण मराठवाड्याच्या आणि राज्यातल्या कुठल्याच शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.” मराठवाड्यात ४८ लाख हेक्टरपैकी ३२ ते ३६ लाख हेक्टर जमिनीवर पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.
एन.डी.आर.एफ. च्या निकषांप्रमाणे पावसामुळे झालेलं नुकसान हे ४ हजार कोटींच्या घरात असल्याचीही माहिती अजित पवारांनी दिली. राज्य सरकारने आतापर्यंत पीक कर्जाचा हप्ता म्हणून १ हजार कोटी दिले आहेत. अकृषिक नुकसानी पोटी ५५० कोटी तर कृषी नुकसानासाठी ३५० कोटी रुपये दिले आहेत. आतापर्यंत झालेल्या सर्व नुकसानाचा अंदाज घेऊन NDRF च्या निकषांचा अभ्यास करुन मुख्यमंत्र्यांना अहवाल दिला जाईल. यानंतर शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज दिलं जाईल अशी माहिती अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दुसरीकडे औरंगाबादेत असलेले केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी जोपर्यंत केंद्र सरकार झालेल्या नुकसानाचा अहवाल केंद्राकडे पाठवत नाही. तोपर्यंत केंद्र सरकार मदत जाहीर करु शकणार नाही असं सांगितलं. पीकविम्यावरुन कराड यांनी पुन्हा राज्य सरकारला दोष दिला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, नगर-बीडला मुसळधार पावसाने झोडपलं
पिक विमा बाबत अडचणी आहे मात्र राज्य सरकारने पिक विमा बाबतचा त्यांचा हप्ता अजून दिला नाही त्यामुळे केंद्र सरकार पैसे टाकू शकत नाही जेवढा वाटा राज्य सरकार भरणार तेवढाच वाटा केंद्र सरकार भरणार, ही प्रक्रिया सुद्धा राज्य सरकार लवकर करेल याबाबत लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे केंद्रीय राज्य अर्थमंत्री भागवत कराड यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT