याकूब मेमनच्या कबरीवरून वाद का निर्माण झाला आहे? उद्धव ठाकरेंवर भाजपचे आरोप काय?

मुंबई तक

08 Sep 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:10 AM)

१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. तसंच यावरून भाजपने ठाकरे सरकारवर भाजपने आरोप केले आहेत. काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण? […]

Mumbaitak
follow google news

१९९३ च्या बॉम्बस्फोटांच्या आठवणी अजूनही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. याच प्रकरणातलं एक नाव म्हणजे दहशतवादी याकूब मेमन. याकूब मेमनला फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान भागात त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याकूब मेमनची कबर पुन्हा चर्चेत आली आहे. तसंच यावरून भाजपने ठाकरे सरकारवर भाजपने आरोप केले आहेत.

हे वाचलं का?

काय आहे याकूब मेमनच्या कबरीचं प्रकरण?

याकूब मेमनच्या कबऱीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत याकूब मेमनची कबर लाईट लावून सजवण्यात आली आहे. तसंच त्या कबरीला मार्बल लावण्यात आलं आहे असं दिसतं आहे. याकूब मेमनला पाच वर्षांपूर्वी फाशी देण्यात आली. त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तान या ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला. फाशी देण्यात आल्यानंतर पोलिसांना याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केला होता. मरीन लाईन्स स्टेशनजवळ असलेल्या बडा कब्रस्तान भागात याकूब मेमनचं पार्थिव दफन करण्यात आलं.

याकूबच्या कबरीवरून राजकारण काय रंगलं आहे?

याकूब मेमनच्या कबरीवरून राजकारण असं रंगलं आहे की भाजपने आता थेट या प्रकरणी आधीच्या सरकारवर म्हणजेच ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत. याकूबच्या कबरीला मजारचं स्वरूप आलं आहे. मुंबईचा गुन्हेगार असलेल्या याकूब मेमनच्या कबरीला मजारचं स्वरूप येणं ही बाब दुर्दैवी आहे या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी काय म्हटलं आहे?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या काळात मुंबईत पाकिस्तानच्या इशाऱ्यावर १९९३ मध्ये बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीला आता मजारचं स्वरूप आलं आहे. हेच का उद्धव ठाकरेंचं मुंबई प्रेम? हीच का यांची देशभक्ती? उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी या सगळ्यांनी याबाबत माफी मागावी.

बडा कब्रस्तानचे कर्मचारी अशफाक अहमद यांनी काय म्हटलं आहे?

मुंबई तकचे प्रतिनिधी एजाज खान यांनी याबाबत बडा कब्रस्तानचे कर्मचारी अशफाक अहमद यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी या सगळ्या वादाबाबत असं म्हटलं आहे की बडा कब्रस्तानमध्ये अनेक अशा कबरी आहेत ज्या ठिकाणी मार्बल अर्थात संगमरवर लावण्यात आलं आहे. या कब्रस्तानात अनेक लोकांनी आपल्या नातेवाईकांसाठी जागा भाडे तत्त्वावर घेतली आहे. दरवर्षी ते लोक याचं भाडं भरतात. त्याचप्रमाणे याकूब मेमनच्या कबरीजवळ तीन आणखी कबरी आहेत ज्या त्याच्या नातेवाईकांच्या आहेत. लाईट लावले गेल्याची बाब ज्या कुणी समोर आणली आहे तो निव्वळ खोडसाळपणा आहे. कारण कब्रस्तानात संध्याकाळी ६ ते रात्री ११ लाईट सुरूच असतात. ११ नंतर लाईट बंद केले जातात.

मात्र याच कालावधीत किंवा रात्री ११ नंतर जर कुणाचा मृत्यू झाला आणि त्यांचा दफनविधी करायचा असेल तर मात्र लाईट लावले जातात. याकूब मेमनच्या कबरीजवळ आणखी काही कबरी आहेत. त्याचे नातेवाईक इथे येत असतात. कबरीची साफ सफाई करत असतात. शब ए बारातच्या दिवशी सगळं कब्रस्तान सजवलं जातं. त्यादिवशीचा फोटो काढून कुणीतरी व्हायरल केला आहे असंही अहमद यांनी म्हटलं आहे.

याकूब मेमनच्या कबरीच्या वादावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

आमचं सरकार असताना जर हे झालं असेल तर कुणी तरी ते लक्षात आणून द्यायला हवं होतं. मला आत्ता तुम्ही प्रश्न विचारत आहात तर मी यासंबंधी माहिती घेऊन बोलेन. मात्र देशद्रोही, समाजकंटक यांचा कोणताही विचार करू नये. चांगल्या गोष्टी बोलण्याचाही प्रयत्न करू नये असं मला वाटतं. भाजपकडून टीका केली जाते आहे. कारण त्यांच्याकडे टीकेसाठी दुसरे मुद्दे नाहीत. महागाई, बेरोजगारी असे सगळे मुद्दे आहेत त्यावर कुणी बोलत नाही. असे विषय समोर आणले जात आहेत. तुमच्या सरकारमध्ये याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण झाल्याचा आरोप होतोय असं विचारलं असता अजित पवार म्हणाले की कोणाचंही सरकार असूद्या, तू मुख्यमंत्री असतास तरीही तुझ्या काळात असं व्हायला नको होतं.

ज्याच्या कबरीवरून वाद झाला आहे तो याकूब मेमन कोण होता?

याकूब मेमनचं संपूर्ण नाव अब्दुल रज्जाक मेमन असं होतं. याकूब पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट होता. मेमन कुटुंबात सर्वाधिक शिकलेला व्यक्ती हा याकूब मेमन होता. १९९३ ला मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. या घटनेने सगळा देश हादरला होता. नेपाळच्या काठमांडूतून याकूबला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    follow whatsapp