एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ केल्याचं अनिल परब यांनी जाहीर केलं. मात्र यानंतर मुख्य प्रश्न आहे तो एसटी कर्मचारी घेणार की नाही. सरकारतर्फे कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. एसटी संप मागे घेण्याबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तर सदाभाऊ खोत यांनी हीच भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या उद्या सकाळी कामावर हजर व्हा असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून करण्यात आलंय. तर संपावेळी केलेल्या कारवाईही मागे घेणार असल्याची घोषणा परब यांनी केलीय. निलंबन मागे घेणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. एसटी कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचं स्वागत होणार की संपावर ठाम राहणार हे अजूनही अस्पष्ट आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कर्मचाऱ्यांशी बोलून संपाबाबत भूमिका घेऊ असं सूचक विधान केलंय. तर सदाभाऊ खोत यांनीही हीच भूमिका मांडली आहे. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानातही दाखल झाले आहेत. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिल परब यांच्या मते जी पगारवाढ देण्यात आली आहे ती एसटीच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. संप मिटवण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेलं हे मोठं पाऊल मानलं जातं आहे.
पाहा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कसा वाढणार
अनिल परब यांनी माहिती देताना सांगितलं की, ‘ज्या कर्मचाऱ्यांना एक वर्ष ते 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याचं मूळ वेतन 12 हजार 80 होतं त्यांचं वेतन आता 17 हजार 80 रुपये झालं आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 17 हजार होतं. त्यांना आता 24 हजार वेतन मिळणार आहे. त्यामुळे एकूण 41 टक्के पगारवाढ झाली आहे.
दरम्यान एसटी कर्मचारी त्यांचा निर्णय गुरूवारी जाहीर करणार आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलून निर्णय घ्यावा लागेल असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT