नो सेलिब्रेशन! पुन्हा घरातच बसावं लागणार?; आरोग्यमंत्री टोपेंनी दिले कडक निर्बंधांचे संकेत

सौरभ वक्तानिया

• 09:17 AM • 29 Dec 2021

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? असा प्रश्न राजेश टोपेंना विचारण्यात आला. त्यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच त्यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे. सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिवसभरात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले आहेत. त्यातले 1377 रूग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागणार का? असा प्रश्न राजेश टोपेंना विचारण्यात आला. त्यावेळी वाढत्या कोरोना रूग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच त्यांनी या प्रश्नाचंही उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

सांगली : मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालय ठरलं कोरोना हॉटस्पॉट; 47 विद्यार्थीनी ‘पॉझिटिव्ह’

नेमकं काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

राज्यात वाढणारी कोरोना रूग्णांची संख्या ही धोक्याची घंटा आहे. केंद्राची टीम दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. ही टीम वाढलेले रूग्ण, त्यांचे प्रमाण, ओमिक्रॉनचे पॉझिटिव्ह रूग्ण, लसीकरण, पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या, दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या या सगळ्या विषयांचं अवलकोन करणार आहे. राज्यात 87 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 57 टक्के आहे. आतापर्यंत 8 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता बोस्टर डोस देण्याबाबतही चर्चा सुरू आहे. मात्र, कोव्हॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तीला कोव्हॅक्सीनचाच बूस्टर डोस द्यायचा की आणखी कुठला, याचे मार्गदर्शन आयसीएमआरकडे मागितले आहे. ते ज्या सूचना देतील, त्यानुसार पालन केले जाईल. मात्र, लसीकरणासाठी स्थानिक नेते, प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे. स्थानिक नेत्यांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांचा क्वारंटाईन काळ कमी करण्यात आला आहे. याबाबत प्रश्न विचारला असता टोपे म्हणाले की, याबाबतचा निर्णय हा आयसीएमआरच्या निर्देशानुसार घेण्यात येईल. गरज पडल्यास आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ. मात्र, ज्यांना शक्य असेल त्यांनी वर्क फ्रॉम होम करा आणि काळजी घ्या. महाराष्ट्रात आपण दिवसाला 8 लाख लसीकरण करत होतो, आता आपण 5 लाख लसीकरण करत आहोत. हे आपल्याला भूषणावह नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राजेश टोपे पुढे म्हणाले की, हायरिस्क देशातून आलेल्यांची चाचणी करून त्यांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने आता नवीन घोषणा केली. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लस द्यायची आहे. आम्ही त्या दृष्टीने सज्ज आहोत. या संदर्भात मी विधानसभेत बोललो आहे. शाळेत कोरोना लसीकरण करता येईल का, याची चाचपणी सुरू आहे. कोमॉर्बिड आणि फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, कोणती लस द्यायची यासंदर्भात आयसीएमआरने माहिती दिलेली नाही. बूस्टर डोसचे लसीकरण 10 जानेवारीपासून होणार असल्याचे ते म्हणाले.

20 तारखेच्या आसपास आपण पाहिलं तर 6 हजारच्या आसपास सक्रिय रूग्ण आहेत. तर आता ती संख्या 10 ते 11 हजारांच्या घरात गेली आहे. मुंबईतही असंच चित्र आहे. सात दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. एक किंवा दोन दिवसात रूग्ण दुप्पट होत आहेत अशी स्थिती आली आहे. रोज सक्रिय रूग्णांची संख्या 400, 500, 600 अशी असायची. आज ती 2 हजारांच्या पुढे पॉझिटिव्ह रूग्ण असू शकतील अशी स्थिती आहे असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

मुंबईत 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यात 2200 रूग्ण आढळले आहेत. याचाच अर्थ मुंबईचा पॉझिटिव्हीटी रेट 4 च्या आसपास गेला आहे. ही बाब काळजी वाढवणारी आहे असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp