लातूर : कर्जबाजारी शेतकऱ्याची बॅरेजमध्ये उडी घेऊन आत्महत्या

मुंबई तक

• 09:23 AM • 07 Nov 2021

अतिवृष्टीत चार एकर शेतजमिनीवरील सर्व पिक वाहून गेल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजय विक्रम बन (वय २४) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली आहे. डोंगरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अजय बन या शेतकऱ्याची नदीपात्रावर चार एकर जमीन आहे. काही महिन्यांपूर्वी मराठवाड्याला अतिवृष्टीचा […]

Mumbai Tak
Google CTA

अतिवृष्टीत चार एकर शेतजमिनीवरील सर्व पिक वाहून गेल्यामुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अजय विक्रम बन (वय २४) असं या तरुण शेतकऱ्याचं नाव असून लातूर जिल्ह्यातील शिरुर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथे ही घटना घडली आहे.

हे वाचलं का?

डोंगरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अजय बन या शेतकऱ्याची नदीपात्रावर चार एकर जमीन आहे. काही महिन्यांपूर्वी मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. या पावसात अजयचं सर्व पिक वाया गेलं. हजारो रुपये खर्च करुन बियाणं खरेदी करत पेरणी केल्यानंतर निसर्गाच्या अवकृपेमुळे हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्यामुळे अजय सतत निराश असायचा. त्यातच बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन बँकांकडून अजयने ८ लाखांचं कर्ज घेतलं होतं.

हे कर्ज फेडायचं कसं या विवंचनेतून अखेरीस अजयने बॅरेजमध्ये उडी मारत आपलं जिवन संपवलं आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मदत जाहीर केली. परंतू अजयच्या ४ एकर शेतजमिनीला फक्त ७ हजाराची सरकारी मदत मिळाली. दिवाळीसारखा सणही पैसे नसल्यामुळे अजयच्या परिवाराने साजरा केला नाही. दरम्यान या घटनेबद्दल स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत शेतकरी विक्रमच्या मागे आई-वडिल, पत्नी आणि एक सहा महिन्याचा लहान मुलगा असा परिवार आहे.