महाराष्ट्र भूषण : सरकार की धर्माधिकारी, कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली?

मुंबई तक

• 10:36 AM • 17 Apr 2023

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सध्या वादात सापडला आहे. त्याच कारण म्हणजे या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेले 12 श्रीसदस्य.

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award controversy 12 died due to heatstroke

Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award controversy 12 died due to heatstroke

follow google news

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी (16 एप्रिल) खारघर येथील भव्य सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा सध्या वादात सापडला आहे. त्याच कारण म्हणजे या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेले 12 श्रीसदस्य. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्रीसदस्य आले होते. पण हा सोहळा भर उन्हात पार पडला, यात उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. (Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award controversy 12 died due to heatstroke)

हे वाचलं का?

यानंतर विरोधकांनी सरकारवर आरोप सुरु केले असून या सोहळ्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. काल महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचारार्थ रुग्णांची विचारपूस केली. यानंतर ठाकरे आणि पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाची वेळ चुकली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

कार्यक्रमाच्या वेळेवरुन काय म्हणाले विरोधक?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं कार्यक्रमाची चुकीची वेळ कुणी दिली? कशी दिली? आणि ढिसाळ नियोजन, ही घटना दुर्दैवी आहे. अमित शाहांना सायंकाळी गोव्यात कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून हा कार्यक्रम सकाळी ठेवण्यात आला आणि दुसरं प्रशासन कुठे कमी पडलं? कोणत्या स्तरावरची चौकशी झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?, असा प्रश्न यावेळी ठाकरेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, “चौकशी करतील की नाही, कल्पना नाही. जसं तुम्ही म्हणालात की अमित शाहांना जायचं होतं म्हणून जर हा कार्यक्रम भरदुपारी घेतला असेल, तर चौकशी कोण कुणाची करणार? परंतु निरपराध जीव गेलेले आहेत. पण, तुम्ही सांगता आहात त्याप्रमाणे अमित शाहांना वेळ नव्हता म्हणून दुपारची वेळ घेतली असेल, तर खरंच खूप विचित्र प्रकार आहे.”

‘मतांच्या राजकारणासाठी एका संताचा…’, जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांवर बरसले

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, उन्हाळा प्रचंड आहे आणि असं असताना दुपारची वेळ निवडणं, हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. चूक दुरुस्त वगैरे चर्चा करून चालणार नाही. मृत्यू झालेल्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. जे उपचार घेताहेत ते लवकर बरे होवोत. आतापर्यंत किती जखमी आहेत, किती उपचार घेताहेत, किती लोकांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडलं, किती जण मृत्यूमुखी पडलेत, हा निश्चित आकडा कळायला मार्ग नाही. या कार्यक्रमाची वेळ चुकली. संध्याकाळची असती, तर अधिक बरं झालं असतं. एप्रिल मे मध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊच नयेत”, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील म्हणाले, “सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.

शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत या कार्यक्रमाच्या वेळेबाबत बोलताना म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वेळेची सोय पाहिली गेल्याचं मला वाटतं. हा कार्यक्रम उन्ह टळल्यानंतर संध्याकाळी केला असता तर बरं झालं असतं. पण गृहमंत्री अमित शाह यांना वेळ नव्हता.”

महाराष्ट्र भूषण सोहळा: 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अमित शाहा म्हणाले, माझं मन…

या घटनेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, राज्य सरकारकडून हा प्रसंग टाळता आला असता. वातावरण उन्हानं तापलं असताना सकाळी इतक्या लोकांना बोलवायचं. राजभवनावर हा कार्यक्रम करता आला असता. झाली ती गोष्ट दुर्दैवी आहे. सकाळपेक्षा संध्याकाळी कार्यक्रम झाला असता तर प्रसंग टाळता आला असता.

महाराष्ट्र भूषण कार्यक्रम आयोजनाची जबाबदारी कोणाकडे असते?

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कारच मुळात राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. पुरस्कार कोणाला द्यायचा इथपासून ते पुरस्काराची सर्व व्यवस्था ही याच विभागाच्या अखत्यारित येते. याच विभागाकडून यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी “सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित आभाळा इतक्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा जाहीर सन्मान” असं म्हणून या पुरस्कार प्रदान सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका प्रकाशित केली होती. या पत्रिकेवरही सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित, असाच उल्लेख आढळून येत आहे.

    follow whatsapp