शरद पवारांबद्दलच्या ‘त्या’ ट्विट्सनी अरविंद केजरीवालांचा ‘गेम’ केला!

भागवत हिरेकर

• 01:12 PM • 26 May 2023

अरविंद केजरीवाल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर केजरीवाल यांचे जुने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे, अंजली दमानिया यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली.

arvind kejriwal tweets about sharad pawar goes viral

arvind kejriwal tweets about sharad pawar goes viral

follow google news

‘दिल्लीतील लोकांच्या विरोधात मोदी सरकारने काढलेला काळा अध्यादेश आपल्या सगळ्यांना मिळून संसदेत रोखायचा आहे. याच मुद्द्यावर आज मुंबईत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवारांसोबत भेट झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राज्यसभेत दिल्लीतील लोकांची साथ देणार आहेत. दिल्लीकरांच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचे आभार मानतो. लोकशाही वाचवण्यासाठीची ही लढाई आम्ही एकजूटीने लढू”, हे विधान आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचं! केजरीवाल यांनी शरद पवारांचे आभार मानले, पण नंतर खरं राजकारण सुरू झालं. त्याला कारणीभूत ठरलंय केजरीवालांचे जुने ट्विट्स. त्यावरूनच भाजपने केजरीवालांना खिंडीत पकडलं.

हे वाचलं का?

अरविंद केजरीवाल यांच्या शरद पवार यांच्या भेटीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्विट केलं. हे ट्विट करताना केजरीवालांचं जुनं ट्विटही शेअर केलं. त्यानंतर बावनकुळेंनी म्हटलं आहे की, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 9 मे 2012 रोजी एक ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘बेईमान ‘ म्हटले होते.”

“पवारांचे स्विस बँकेत खाते असून त्याबाबतची माहिती आम्ही जनतेसमोर आणू असा इशारा देखील केजरीवाल यांनी दिला होता. पवारांची जागा तुरुंगात आहे, अशी टीका सुद्धा केजरीवाल यांनी केली होती. आणि आज अचानक केजरीवाल यांना शरद पवार प्रामाणिक वाटू लागले, ते देशातील आदरणीय नेते असल्याचा साक्षात्कार देखील केजरीवालांना आता झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विरोध करण्यासाठी विरोधक किती खालच्या पातळीवर जाऊ शकतात त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे केजरीवाल आणि पवार यांची आजची भेट होय”, असं बावनकुळे म्हणाले.

अंजली दमानियांनीही सुनावलं

इंडिया अगेस्ट करप्शन या आंदोलनात एकेकाळी केजरीवालांसोबत राहिलेल्या अंजली दमानियांनीही ट्विट करत टीका केली आहे. दमानियांनी म्हटलं आहे की, “2012 साली ‘इंडिया अगेन्स्ट करपशन ‘ म्हणजेच भ्रष्टाचाराविरुद्ध जनआंदोलनाची सुरुवात झाली. माझ्यासारख्या असंख्य लोकांनी आपले तन मन धन वाहून स्वतःला ह्यात झोकून दिलं. कित्येक कार्यकर्त्यांनी आपली करियरची वाट लावून देश भ्रष्टाचार मुक्त व्हावा म्हणुन लढले. पण तेच अरविंद केजरीवाल आज शरद पवार, अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व उद्धव ठाकरे ह्या सारख्या लोकांबरोबर बघून तळ पायाची आग मस्तकाला गेली. अशा गलिच्छ व संधीसाधू राजकारणापासून मी दूर आहे आणि मरे पर्यंत राहीन. आपल्या तत्त्वांना जपून”, अशा शब्दात दमानियांनी संताप व्यक्त केला.

त्यानंतर केजरीवाल यांचे शरद पवार यांच्याबद्दलचे काही ट्विट्सही व्हायरल झाले आहेत.

अरविंद केजरीवालांनी पवारांबद्दल काय केले होते ट्विट्स?

केजरीवालांनी एका ट्विटमध्ये म्हटलेलं की, “हेच मोदीजींचं सत्य आहे. शरद पवार यांच्यासोबत मिळून देशातील काळधन दूर करणार आहेत. मोदीजींना रांगेत उभे राहणारे लोक चोर वाटताहेत आणि शरद पवार ईमानदार.”

दुसऱ्या एका ट्विटमध्ये केजरीवाल म्हणतात, “शरद पवार यांन पद्म विभूषण देण्याची हिंमत दाखवली, त्याबद्दल नरेंद्र मोदींना भारतरत्न मिळायला हवा.”

आणखी एका ट्विटमध्ये केजरीवालांनी म्हटलेलं की, “शरद पवार, सुभाष चंद्रा, अडाणी, अंबानी, बादल आनंदात आहेत. महिला, व्यापारी, शेतकरी, मजूर जास्त चिंतेत आहेत.”

एकेकाळी शरद पवारांवर टीका करणारे अरविंद केजरीवाल आता मोदी सरकारने आणलेला अध्यादेश रोखण्यासाठी पवारांना भेटले. त्यांनी पवारांचं कौतुक केलं आणि आभारही मानले. पण, नेटकऱ्यांनी केजरीवालांना त्यांच्या पवारांबद्दलच्या जुन्या भूमिकांची आठवण करून दिली. याच जुन्या ट्विट्सनी केजरीवालांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याचं दिसून आलं.

    follow whatsapp