BMC Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांना उमेदवारी देत निष्ठावंताना वाऱ्यावर सोडल्याचं चित्र राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने हा प्रकार होताना पाहायला मिळतोय. बाहेरुन आलेल्यांना पायघड्या, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याने मुंबईत भाजपात पहिला राजीनामा पडलाय. मुलुंडमधील भाजप नेते प्रकाश मोटे यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना करत भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यावेळी त्यांनी खदखद व्यक्त करणारे एक पत्र सुद्धा लिहिले आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : अखेर किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर, हातातील एबी फॉर्म दाखवत मातोश्रीबाहेर येऊन दिली पहिली प्रतिक्रिया
प्रकाश मोटे यांनी पत्रात काय काय म्हटलं?
"सप्रेम नमस्कार,
मी, प्रकाश विठ्ठल मोटे, महामंत्री मुलुंड मध्य-विधानसभा, आज अत्यंत जड अंतःकरणाने हे पत्र लिहीत आहे. गेल्या 32 वर्षांहून अधिक काळ मी भारतीय जनता पार्टीत एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले. पक्षाची विचारधारा, संघटनाची शिस्त आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हेच माझ्या राजकीय प्रवासाचे अधिष्ठान राहिले आहे.
मुलुंडमध्ये संघटन उभारणीपासून ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीपर्यंत, पक्षकार्य हेच माझे जीवन होते. कोणत्याही पदासाठी नव्हे, तर जनतेसाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करत राहिलो. मात्र, सध्याच्या काळात काही निर्णयांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे, ही बाब मला अस्वस्थ करते. या परिस्थितीत, आत्मसन्मान आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाची बाजू जपत, कोणताही वैयक्तिक आकस न ठेवता, मी भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तसेच माझ्याकडे असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत आहे."
बाहेरून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना घेरलं
दरम्यान, नागपूर भाजपमध्ये देखील बाहेरुन आलेल्यांना उमेदवारी देण्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेले पाहायला मिळाले. प्रभाग 15 मधील उमेदवारीबाबत बाहेरून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याच्या आरोपा करण्यात आला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी थेट भाजप प्रदेश नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरले आणि निष्ठावंतांना उमेदवारी का मिळत नाही? असा सवाल केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











