Chhatrapati Sambhaji Nagar Mahapalika Election 2026, छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीत आणि वारशात महत्त्वाचं स्थान असलेलं छत्रपती संभाजीनगर शहर पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलं आहे. शहराच्या प्रशासन आणि विकासाची जबाबदारी सांभाळणारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC) ही केवळ प्रशासकीय संस्था नसून, शहराच्या सर्वांगीण विकासाचा कणा मानली जाते. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ शहराला देण्यात आलेल्या या नावामुळे ऐतिहासिक अस्मितेला अधिक बळ मिळालं आहे. पूर्वी औरंगाबाद महानगरपालिका म्हणून ओळखली जाणारी ही संस्था 1936 मध्ये नगरपरिषद म्हणून स्थापन झाली होती. त्यानंतर 1982 मध्ये तिला महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला.
ADVERTISEMENT
आगामी निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष
दीर्घकाळ प्रशासक राजवटीखाली असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधी येणार असल्याने आगामी निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बदललेली राजकीय समीकरणं, आरक्षण, प्रभागरचना आणि विकासाचे मुद्दे यामुळे यंदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. शहराचा कारभार पुढील काळात कोणाच्या हाती जाणार, याकडे संभाजीनगरकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.
प्रभागरचना : 29 प्रभाग, लोकसंख्येचं असमतोल चित्र
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभागरचनेनुसार शहरात एकूण 29 प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी 28 प्रभागांची लोकसंख्या 40 ते 46 हजारांच्या दरम्यान आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असून, प्रभाग क्रमांक 29 मध्ये सर्वात कमी म्हणजे सुमारे 29 हजार लोकसंख्या आहे. महापालिकेच्या टप्पा क्रमांक तीन इमारतीत ही प्रभागरचना नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी सात प्रभागांमध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या तुलनेने अधिक आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये सर्वाधिक, तर 3, 4, 8, 9, 18 आणि 28 या प्रभागांमध्येही एससी लोकसंख्या लक्षणीय आहे.
आरक्षणाचं गणित
महापालिकेतील आरक्षण रचना सामाजिक समतोल साधणारी आहे.
अनुसूचित जाती (SC): 22 जागा, त्यापैकी 11 महिला
अनुसूचित जमाती (ST): 2 जागा, त्यापैकी 1 महिला
मागासवर्गीय (OBC): 31 जागा, त्यापैकी 16 महिला
एकूण महिला आरक्षण: 58 जागा
2015 मधील पक्षीय बलाबल
2015 मध्ये झालेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत राजकीय चित्र बहुरंगी दिसून आलं होतं. शिवसेनेने 28 जागा जिंकत आघाडी घेतली होती. एमआयएम 24 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजपला 23 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. याशिवाय अपक्षांनी 18 जागांवर विजय मिळवून महत्त्वाची भूमिका बजावली होती. बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 4 जागा, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डे) ला 2 जागा मिळाल्या होत्या. एकूण सभागृह संख्या 115 इतकी होती.
महापालिकेची रचना आणि जबाबदाऱ्या
महानगरपालिकेत लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नगरसेवक असतात आणि त्यांचं नेतृत्व महापौर करतात. शहर दहा झोनमध्ये विभागण्यात आलं असून, त्याअंतर्गत एकूण 120 प्रशासकीय विभाग कार्यरत आहेत. महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा, तर अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती कामकाज पाहते. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, रस्ते, पथदिवे, सार्वजनिक आरोग्य सेवा, प्राथमिक शिक्षण यांसारख्या मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याची जबाबदारी सीएसएमसीवर आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी आदी माध्यमातून महापालिकेचा महसूल गोळा केला जातो. प्रशासनाची सूत्रे महानगरपालिका आयुक्तांकडे असून, ते आयएएस अधिकारी असतात. 2021 पासून महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
नाशकात राडा, ठाकरेंच्या युतीनंतर पेढे वाटणारे विनायक पांडे भाजपात जाणार, पण फरांदेंनी वाट अडवली अन्
ADVERTISEMENT











