Devendra Fadnavis on Eknath Shinde, मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रयत्न करतात, अशी चर्चा असते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे भाष्य करत वस्तुस्थिती वेगळी असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. शिवाय, महाराष्ट्रात 'ऑपरेशन देवेंद्र' सुरु असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते मुंबई Tak बैठकमध्ये बोलत होते. ते नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT
शिंदेंच्या CM पदाच्या महत्त्वकांक्षेवर फडणवीसांचं भाष्य
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "त्यांची (एकनाथ शिंदे) इच्छा आहे की नाही? या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा एक पॉलिटिकल रिअॅलिटी समजून घ्या.. ज्या राज्यामध्ये बहुमतासाठी 145 जागा लागतात. अशा राज्यात ज्या पक्षाकडे स्वत:चे निवडून आलेले 137 आमदार आहेत. त्या पक्षाचा मुख्यमंत्री राहिल की, दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल? 137 आमदार असलेल्या पक्षाचाच राहत असतो. त्या पक्षाचे नेते त्यांच्याच पक्षाचा नेता मुख्यमंत्री करत असतात. त्यामुळे अशा कितीही कहाण्या स्टोऱ्या तयार झाल्या.. रिअॅलिटी काय आहे? मला माहिती आहे. वास्तविकता काय आहे? शिंदे साहेबांनाही माहिती आहे. आमच्या दोघांमध्ये योग्य तो संवाद आहे. बातम्या छापून आल्याने मी कधी डिस्टर्ब होत नाही. शिवाय, अशा बातम्यांमुळे राजकारणात काही बदलतही नाही."
"कोणाच्या अपेक्षांची उड्डाणे थांबावित असं का वाटावं? राजकारण आहे. नेतेमंडळींच्या अपेक्षा आहेत. प्रत्येकाला वाटतं मला काहीतरी करुन दाखवण्याची संधी मिळाली पाहिजे", असंही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.
ठाकरेंच्या'ऑपरेशन देवेंद्र'च्या दाव्यावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी त्यांचे खासदार फुटल्यानंतर हे ऑपरेशन टायगर नाही, तर महाराष्ट्रात 'ऑपरेशन देवेंद्र' सुरु आहे असं म्हटलं होतं. अमित शाहांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मराठी चेहरा हटवायचा आहे. म्हणजेच अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांविरोधात कुरघोडी सुरु आहे, अशी मांडणी उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला देखील देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.
देवेंद्र फडणवीस ठाकरेंना प्रत्युत्तर देताना म्हणाले, हिंदीमध्ये एक गाणं आहे. माना के तेरे जहाँ में यह नही की प्यार नही मिलता..वो जब चाहिए तब नही मिलता..उद्धव ठाकरेंचं हे प्रेम मला 2019 साली हवं होतं. तेव्हा प्रेम भंग झालेला आहे. आता थोडं प्रेम जुळणे कठीण आहे. प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं. संसार थाटलाय. पुन्हा त्या लग्नाचे वाढदिवस झाले. आता काय राहिलंय?
ADVERTISEMENT











