आप्पासाहेबांच्या बंगल्याबाहेरची रांगोळी पुसली, रोषणाई उतरवली.. रेवदंड्यात काय स्थिती?

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 17 Apr 2023, 11:11 AM)

12 श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रमाणेच धर्माधिकारी कुटुंबावरही शोककळा पसरल्याचं चित्र

Maharashtra Bhushan Award after the death of 12 members whats is the condition in revdanada

Maharashtra Bhushan Award after the death of 12 members whats is the condition in revdanada

follow google news

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना रविवारी (16 एप्रिल) खारघर येथील भव्य सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, हा पुरस्कार सोहळा सध्या वादात सापडला आहे. त्याच कारण म्हणजे या पुरस्कार सोहळ्या दरम्यान मृत्यूमुखी पडलेले 12 श्रीसदस्य. या पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून लाखो श्रीसदस्य आले होते. पण हा सोहळा भर उन्हात पार पडला, यात उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण 100 जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील 12 श्री सदस्यांचा मृत्यू झाला तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे. (Appasaheb Dharmadhikari Maharashtra Bhushan award controversy 12 died due to heatstroke)

हे वाचलं का?

रेवदंड्यात काय आहे स्थिती?

दरम्यान, या दुःखद घटनेवर अद्यापपर्यंत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र 12 श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रमाणेच धर्माधिकारी कुटुंबावरही शोककळा पसरल्याचं चित्र आहे. या घडलेल्या घटनेनंतर धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील घरासमोरील रांगोळी पुसण्यात आली आहे. तसंच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर असलेली फुलांची आरासही हटविण्यात आली आहे. याशिवाय समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून धर्माधिकारी यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

‘मतांच्या राजकारणासाठी एका संताचा…’, जितेंद्र आव्हाड शिंदे-फडणवीसांवर बरसले

महाराष्ट्र भूषण सोहळा : मृत पावलेल्या व्यक्तींची नावे

खारघर येथील सोहळ्यात उपस्थित राहिलेल्या आणि उष्माघातामुळे मृत पावलेल्यांपैकी 8 महिला असून, 3 पुरुष आहेत. एकूण 11 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय पनवेल नेण्यात आले होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
1) महेश नारायण गायकर (वय 42, गाव- वडाळा, मुंबई, मूळ गाव – म्हसळा मेहंदडी)
2) जयश्री जगन्नाथ पाटील (वय 54, गाव – म्हसळा, रायगड)
3) मंजुषा कृष्णा भोंबंडे (वय 51, गाव – गिरगाव मुंबई मुळगाव श्रीवर्धन)
4) स्वप्निल सदाशिव केणी (वय 30, गाव – शिरसाटबामन पाडा विरार)
5) तुळशीराम भाऊ वांगड (वय 58, गाव -जव्हार पालघर)
6) कलावती सिद्राम वायचळ (वय 45, गाव – तोडकर आळी सोलापूर)
7) संगीता संजय पवार (गाव – मंगळवेढा सोलापूर)
8) भीमा कृष्णा साळवे (वय 58, गाव – कळवा ठाणे)
उर्वरित तीन मृतांमध्ये महिला असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, अशी माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र भूषण : सरकार की धर्माधिकारी, कार्यक्रमाची वेळ कुणी ठरवली?

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल :

दरम्यान, या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर आरोप सुरु केले असून या सोहळ्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेत. रविवारी (16 एप्रिल) महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन उपचारार्थ रुग्णांची विचारपूस केली. यानंतर ठाकरे आणि पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कार्यक्रमाची वेळ चुकली असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

    follow whatsapp