Gopichand Padalkar on Rohit Pawar, सोलापूर : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. अपघात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात? असा सवाल रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांना केला होता. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
"तुमच्यासोबत गुंडगिरी क्षेत्रातील किती लोक आहेत?"
गोपीचंद पडळकर म्हणाले, निलेश घायवळ हा रोहित पवारांचा जोडीदार होता. तो रोहित पवारांचा दोस्त होता. रोहित पवारांसोबत मकोका लागलेले गुंड असतात. गेल्या दोन-तीन वर्षातील व्हिडीओ पाहा. त्यांच्या आजू-बाजूला मकोका लागलेले किती गुंड फिरत असतात. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. चंद्रकांत पाटील काय भूमिका घ्यायची ती घेतील. ते संवेदनशील आहेत, त्यांना कोणाला वाचवायची गरज नाही. एका सुतगिरणी कामगाराचा मुलगा (चंद्रकांत पाटील) महाराष्ट्राचा मंत्री झालाय. तुमच्यासोबत गुंडगिरी क्षेत्रातील किती लोक आहेत? याची श्वेतपत्रिका काढायला पाहिजे काय? कोणी कोणाला सल्ला द्यावा? याचा आत्मपरीक्षण करावं.
रोहित पवार काय म्हणाले होते?
माननीय चंद्रकांतदादा पाटील, तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भरदिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही. गौतमी पाटील हिला मी ओळखत नाही, पण तिच्या गाडीमुळं रिक्षाचा अपघात झाला असेल तर निश्चितच त्याची चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्या रिक्षावाल्या कुटुंबाला भरीव मदत मिळाली पाहिजे आणि जखमीचा वैद्यकीय खर्चही वसूल केला पाहिजे. पण अपघातग्रस्त गाडीत गौतमी पाटील नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवर दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही…!
आपल्याविषयी माझ्या मनात आदर आहे, आपण संवेदनशील आहात. पण कार्यकर्त्यांचं किती ऐकायचं हेही आपण ठरवलं पाहिजे. महिला, गरीब, सामान्य माणूस यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी असे फोन केले तर राज्यात खऱ्या अर्थाने रामराज्य येईल.. पण गुंडांना पाठीशी घालून आणि निरपराधांना गुन्ह्यात गोवून मंत्री म्हणून आपण कोणता आदर्श घालून देत आहात?
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
