Sanjay Raut on Milind Deora Resignation : दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडला. लोकसभा २०२४ निवडणुकीच्या अनुषंगाने देशात राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेसला मुंबईत झटका बसला आहे. देवरा यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण मुंबईवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे. ही जागा ठाकरे गटाकडे जाणार, असे म्हटले जात असल्याने देवरांनी राजीनामा दिल्याचे समोर आले. यावर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊतांनी निष्ठेचा मुद्दा छेडत यावर भूमिका मांडली.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. मिलिंद देवरांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “मला काहीच वाटत नाही. मला काय वाटणार? आम्हाला कशा करता काही वाटायला पाहिजे.”
हेही वाचा >> ठाकरेंचे आठ आमदार आमच्या संपर्कात; भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा दावा
“मूळात असं आहे की, हा महाराष्ट्र आहे, जर कु्णी निवडणूका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील, तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे. त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत. त्यावर काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी. मी कशा करता बोलू, माझ्या पक्षाचा त्याच्याशी संबंध नाही”, असे राऊत म्हणाले.
दक्षिण मुंबईतून सावंत उमेदवार
राऊत म्हणाले,”अरविंद सावंत हे तिथले विद्यमान खासदार आहेत. ते दोन वेळा निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे अरविंद सावंत शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार असतील, तर त्यात चुकीचे काय आहे. ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे. मुंबईमध्ये जिथे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत, त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून येतील”, अशी भूमिका राऊत यांनी मांडली.
हेही वाचा >> ‘त्यांनी शाखा तोडली.. सत्ता येऊ द्या त्यांचे कंबरडेच मोडतो’, ठाकरे संतापले
काँग्रेस सोडण्याच्या निर्णयावरून राऊतांनी मिलिंद देवरांना चिमटा काढला. “शिवसेनेलाही विचारा २५-३० वर्षांचं नातं तोडून जातात. आता कुठे राहिलीये निष्ठा, विचारधारा. आता सत्तेचं राजकारण आहे. खोक्यांचं राजकारण आहे. आम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुरली देवरांना ओळखतो. मोठे नेते होते. काँग्रेसबद्दल त्यांची निष्ठा होती”, असे म्हणत राऊतांनी देवरांवर निशाणा साधला.
ADVERTISEMENT