मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर असेंडिया या कंपनीने मुंबईतील विविध समाजघटकांमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये मतदारांना युती, आघाडी, हिंदुत्व, मराठी भाषा यापेक्षाही एक मुद्दा अधिक महत्त्वाचा वाटतोय. तो म्हणजे त्यांच्या प्रभागातील 'नगरसेवकाने मागील टर्ममध्ये केलेले काम.' या गोष्टीला मुंबईकर सर्वाधिक प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. या सर्व्हेमध्ये महिलांपासून मुस्लिम आणि मुंबईतील मराठी माणसांचा समावेश करण्यात आला असून, विकास आणि इतर मुद्द्यांबाबतही मतदारांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सर्व्हे मुंबईतील राजकीय वातावरणाला नवे वळण देणारे ठरू शकते, ज्यात पारंपरिक घटकांऐवजी व्यावहारिक मुद्दे पुढे येत आहेत.
ADVERTISEMENT
असेंडिया कंपनीने मुंबईतील महत्वाच्या राजकीय प्रश्नांवर हा सर्व्हे केला असून, मतदारांना 'मतदान करताना तुम्ही कोणता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवून मतदान कराल?' असा प्रश्न विचारण्यात आला. सर्व्हेमध्ये चार मुख्य गटांची मतं विचारात घेण्यात आली.
महिला (Mahila), मुस्लिम (Muslim), मराठी माणूस (Marathi Manoos) आणि इतर (Others - गुजराती, उत्तर आणि दक्षिण भारतीय इ.) या चारही गटांमधील सर्व मतदारांनी एकाच मुद्द्याला सर्वाधिक पसंती दिली आहे. ती म्हणजे आपल्या प्रभागात नगरसेवकाने केलेलं काम. सर्व गटातील लोकांनी या मुद्द्याला 45% ते 52% इतके प्राधान्य दिले आहे. हे दर्शवते की, मुंबईकर मतदार आता स्थानिक पातळीवरील कामगिरीला अधिक महत्व देत आहेत.
सर्व्हेच्या मुख्य निष्कर्ष:
1. नगरसेवकाने केलेले काम (Work done by Corporator): हा मुद्दा सर्व गटांमध्ये अव्वल आहे. या मुद्द्याला महिलांनी 45%, मुस्लीम मतदारांनी 47%, मराठी मतदारांनी 52% आणि इतर गटांमधील मतदारांनी 45% मत दिलं आहे. याचा अर्थ असा की, मुंबईतील मतदार आता निवडणुकीत इतर मुद्द्यांपेक्षाही नगरसेवकांच्या मागील कामगिरीवर आधारित निर्णय घेणार आहेत. मराठी मतदार तर याच मुद्द्यावर त्यांच्या नगरसेवकाला पसंती देऊ शकतात. कारण 52 मराठी मतदारांना त्यांच्या नगरसेवकाने केलेलं काम हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं.
2. मुद्दे आणि विकास (Issues & Development): दुसऱ्या क्रमांकावर हा मुद्दा आहे. मुस्लिम मतदारांनी 26% याला प्राधान्य दिले, तर मराठी मतदारांनी 20%, इतर मतदारांनी 18% आणि महिला मतदारांनी 14% या मुद्द्यांवर मतदान केलं जाईल असं म्हटलं आहे. मुंबईसारख्या शहरात रस्ते, पाणी, आरोग्य आणि विकास प्रकल्प हे मुद्दे नेहमीच चर्चेत असतात, आणि हे आकडे दर्शवतात की मुस्लिम समुदाय देखील विकासाच्या मुद्द्यांवर अधिक संवेदनशील आहे.
3. पक्ष चिन्ह (Party Symbol): या गोष्टीला फार कमी प्राधान्य देण्यात आलं आहे आहे. महिला मतदारासाठी पक्ष चिन्ह याला 2%, मराठी मतदारांनी 4%, आणि इतरांनी 2% महत्त्व दिलं आहे. तर मुस्लीम मतदारांना हा मुद्दा अजिबात महत्त्वाचा वाटत नसल्याचं सर्व्हेत दिसतं आहे. याचा अर्थ असा की, मतदार आता पक्षाच्या चिन्हापेक्षा व्यक्तिगत किंवा मुद्द्यांवर आधारित मतदान करू शकतो.
4. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा चेहरा (CM & PM Face): हा मुद्दा देखील कमी महत्वाचा ठरला आहे. सर्व गटांमध्ये 2% ते 4% इतकेच प्रमाण आहे. मुंबईच्या स्थानिक निवडणुकीत राष्ट्रीय नेत्यांचा प्रभाव कमी होत असल्याचे हे संकेत देतात.
5. स्थानिक उमेदवार (Local Candidate): या मुद्द्याला देखील अगदी नगण्य प्राधान्य आहे. मराठी मतदारांमध्ये 4%, इतर गटांमध्ये 1% किंवा त्यापेक्षा कमी.
6. जात/धर्म (Caste/Religion): हा मुद्दा देखील फार कमी लोकांनी विचारात घेतला आहे, सर्व गटांमध्ये 0% ते 1% इतकेच याला महत्त्व दिले आहे. मुंबईसारख्या बहुसांस्कृतिक शहरात जात आणि धर्माच्या आधारावर मतदान कमी होत असल्याचे हे दर्शवते.
7. इतर (Others): याशिवाय इतरही काही सामूहिक मुद्दे आहेत ज्याला लोकांनी प्राधान्य दिलं आहे. महिला मतदारांनी 34%, मुस्लीम मतदारांनी 23%, मराठी मतदारांनी 18% आणि इतर गटांमधील मतदारांनी 30% इतर मुद्द्यांना प्राधान्य दिले. हे 'इतर' मुद्दे वैयक्तिक संबंध, आर्थिक फायदे किंवा इतर स्थानिक समस्या असू शकतात.
या सर्व्हेचे नमुने मुंबईतील विविध भागांतील मतदारांपासून घेण्यात आले असून, ते BMC निवडणुकीच्या तयारीत महत्वाचे ठरू शकतात. मुंबई महापालिका निवडणुका 2022 पासून रखडलेल्या आहेत. अखेर 4 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मुंबईकरांना त्यांचे नगरसेवक निवडण्याची संधी आहे. असेंडिया कंपनीच्या या सर्व्हेनुसार, राजकीय पक्षांना आता नगरसेवकांच्या कामगिरीवर आणि विकास मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मराठी मतदारांनी देखील नगरसेवकांच्या कामाला 52% प्राधान्य देणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. हा सर्व्हे मुंबईच्या राजकीय लँडस्केपला नवे परिमाण देतो आणि पक्षांना त्यांच्या प्रचार मोहिमेत बदल करण्यास भाग पाडू शकतो. BMC निवडणुकीत 227 जागा असून, हे आकडे मतदारांच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहेत.
ADVERTISEMENT











