Devendra Fadanvis on BMC Mayor : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'रितू तावडे यांच्याकडे एक अमुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून बघितलं जातंय. मुंबईकरांच्या प्रश्नाकरिता त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.' दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या प्रेस कॉन्फरन्सविषयी भाष्य केले. याविषयी फडणवीस नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!
'रितू तावडे अस्सल मराठी चेहरा'
मुंबईच्या नूतन महापौर पदी रितू तावडे यांची बिनविरोध निवड झाली. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'लोकाभिमुख आणि पारदर्शी प्रशासन देण्याबद्दल मी आणि शिंदे साहेबांनी मतं मागितली होती. त्यावरुन मुंबईच्या जनतेने आम्हाला दिलेल्या प्रतिसादाला अनुरुप अशाप्रकारचं पदारोहण याठिकाणी होतंय. महापौर रितू तावडे एक अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातंय. मुंबईकरांच्या प्रश्नाकरिता त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीच्या सरकारने सुरु केलेला विकासाच कार्यक्रम महानगरपालिकेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे पुढं नेला जाईल.'
रोहित पवार यांच्या प्रेस कॉन्फरन्सविषयी काय म्हणाले फडणवीस?
अजित दादांचा घातपात झाली असण्याची शक्यता व्यक्त करणारी एक प्रेस कॉन्फरन्स रोहित पवार यांनी घेतली होती. यामध्ये त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'रोहित पवार यांची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली नाही. जर कोणाच्या मनात अजितदादांच्या अपघाताविषयी काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन झालं पाहिजे. अपघाताविषयी चौकशी सुरु झाली आहे. डीजीसेफ्टी कडून याविषयी चौकशी सुरु आहे. ब्लॅक बॉक्सही मिळाला आहे. आपल्याला ही चौकशी संपण्याची वाट पहायला हवी. या अपघाताची चौकशी व्हावी यासाठी सर्वात आधी केंद्र सरकारला मीच पहिल्यांदा पत्र लिहिले होते. त्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी विशेष चौकशी समिती गठित करुन त्यासंदर्भात मला पत्र पाठवलं आहे. जी चौकशी सुरु आहे ती पूर्ण न होता आपण तर्क-वितर्क केले तर लोकांच्या मनात शंका तयार होतात. डीजीसेफ्टी, सीआयडी आणि डीजीसीए यांच्याकडून चौकशी सुरु आहे. भारतातल्या चौकशी यंत्रणांवर कोणीही अविश्वास दाखून नये. कारण या संस्था आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. शंका व्यक्त करणं चुकीचं नाही. फक्त कुठल्याही राजकीय हेतूने आणि अजितदादांच्या दुर्दैवी मृत्यूचं राजकारण केलं जाणार नाही याबद्दल प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.'
'क्वीन गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो'
मुंबई महानगरपालिकेत फडणवीस हे दुसऱ्यांदा आले होते. याविषयी बोलताना ते म्हणाले की, 'यापूर्वी मी एकदा मुंबई महापालिकेत आलो होतो. मात्र क्वीन गॅलरीत मी पहिल्यांदाच बसलो. सभागृहाचं कामकाजही मी पहिल्यांदाच बघितलं आहे. ही एक ऐतिहालिक वास्तू आणि हेरिटेज प्रकारची प्रॉपर्टी आहे. त्याठिकाणी या सोहळ्याचं साक्षीदार होणं महत्त्वाचं आहे.' प्रशासकाच्या कारभाराविषयी बोलताना ते म्हणाले की, 'महानगरपालिका ही लोकशाहीचं एक महत्त्वाचं अंग आहे. प्रशासकाचं राज्य हे लोकशाहीला अपेक्षित नाही. लोकप्रतिनिधींचं राज्य लोकशाहीला अपेक्षित आहे. ते राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित झालं आहे. जनसामान्यांना लोकप्रतिनिधी अधिक जवळचे वाटतात. तो परिणाम मुंबईत दिसून येईल.'
हे ही वाचा : एकीकडे एकत्र येण्याची जोरदार चर्चा अन् दुसरीकडे पवारांच्या खासदारांची दिल्लीत भलतीच खेळी!
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
नूतन महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'बाळासाहेबांचे जन्मशताब्दीनिमित्त त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचे काम महायुती करले. झोपडपट्टीमुक्त मुंबई असं त्यांचं स्वप्न होतं. ४० लाख लोकांना घरं देण्याचं काम आम्ही सुरु केलं आहे. मुंबईकरांना विकास पाहिजे. म्हणून मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर आहे. त्यादृष्टीने जे आवश्यक आहे ते आम्ही करु. पंतप्रधान मोदींनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे. मोदींना, बाळासाहेबांना अपेक्षित असलेली मुंबई घडवण्याचं काम महायुती करेल असा विश्वास मी देतो.'
ADVERTISEMENT











