उल्हासनगर: उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी ओबीसी (OBC) प्रवर्ग आरक्षित झाल्याची घोषणा होताच शहरातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झालं आहे. या निर्णयानंतर शिवसेना महापौरपदाची प्रमुख दावेदार म्हणून पुढे आली असून, पक्षातून तीन नावांची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अश्विनी कमलेश निकम, डिंपल नरेंद्र ठाकूर आणि राजेंद्र चौधरी ही शिवसेनेची तीन मजबूत नावे सध्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर मानली जात आहेत. यापैकी अश्विनी निकम आणि डिंपल नरेंद्र ठाकूर या 'टीम ओमी कलानी' (TOK) गटाशी संबंधित आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या गटाने निर्णायक भूमिका बजावली होती.
ADVERTISEMENT
सूत्रांच्या माहितीनुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टीम ओमी कलानीतील 27 उमेदवारांनी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, त्यापैकी 18 उमेदवार विजयी झाले. या योगदानाच्या पार्श्वभूमीवर, अंतर्गत सत्ता-संतुलन राखण्यासाठी महापौरपदाचा पहिला अडीच वर्षांचा कार्यकाळ TOK गटाला दिला जाऊ शकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
अश्विनी कमलेश निकम
संघटनात्मक ताकदीमुळे अश्विनी निकम यांचे नाव गांभीर्याने घेतले जात आहे. त्यांचे पती कमलेश निकम हे टीम ओमी कलानीचे प्रवक्ते असून, ओमी कलानी यांचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना आणि TOK यांच्यातील युती मजबूत करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली असून स्थानिक शिवसेना नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. अश्विनी निकम यांनी कायद्याचे शिक्षण घेतलं आहे आणि त्या पतीसोबत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांना प्रशासकीय जाण आणि तळागाळातील अनुभव असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: खासदार संजय राऊतांना कर्करोग झाल्याचं कधी समजलं? कोणता कॅन्सर झाला? स्वत: सांगितलं
डिंपल नरेंद्र ठाकूर
TOK गटातील आणखी एक प्रभावी ओबीसी चेहरा म्हणजे 38 वर्षीय डिंपल नरेंद्र ठाकूर. त्या व्यवसाय व्यवस्थापन विषयातील पदवीधर असून, सिंधी समाजातून येतात. उल्हासनगर हा शहर सिंधीबहुल मानला जात असल्याने या समाजाचे राजकारणात मोठं वजन आहे. डिंपल ठाकूर या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे वडील नरेंद्र ठाकूर हे पाच वेळा नगरसेवक राहिले आहेत. शिवसेना सध्या सिंधी समाजाशी आपली नाळ अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे डिंपल ठाकूर यांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या योग्य उमेदवार मानलं जात आहे.
राजेंद्र चौधरी
जर शिवसेनेने आपल्या मूळ संघटनात्मक नेतृत्वातील उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय घेतला, तर उल्हासनगर महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी हे सर्वात मजबूत पर्याय ठरतात. जवळपास 40 वर्षे शिवसेनेशी निष्ठावंत असलेले चौधरी सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मराठी, सिंधी आणि हिंदी भाषिक समाजात त्यांचा चांगला जनाधार आहे. याशिवाय, त्यांच्या पत्नी राजश्री चौधरी यांनी यापूर्वी अडीच वर्षांचा महापौरपदाचा कार्यकाळ यशस्वीपणे सांभाळला असल्याने, त्यांची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली आहे.
हे ही वाचा: 'कैसा हराया' फेम नगरसेविका सहर शेख यांचा माफीनामा, किरीट सोमय्यांची माहिती; 'ते' वक्तव्य भोवलं
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेने स्थानिक पातळीवर टीम ओमी कलानी, SAI गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्यासोबत युती केली होती, तर भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मित्रपक्षांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना 40 नगरसेवकांच्या बहुमताचा आकडा गाठण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळे उल्हासनगरचा महापौर शिवसेनेचाच होणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आता केवळ एकच प्रश्न शिल्लक आहे तो म्हणजे या तीनपैकी शिवसेना कोणाच्या हाती उल्हासनगरच्या महापौरपदाची सूत्रे सोपवणार? येत्या काही दिवसांत होणारा हा निर्णय केवळ महापौरपदापुरताच मर्यादित न राहता, पुढील अडीच वर्षांसाठी शहराच्या राजकीय दिशेला आकार देणारा ठरणार आहे.
ADVERTISEMENT











