नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आज (21 जुलै) काही वेळापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ज्यामध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचाही समावेश होता. दरम्यान, आपल्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तात्काळ नवी दिल्लीतील मंदिर मार्ग पोलीस स्टेशन गाठलं. तिथे प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात ठेवले होते. त्यावेळी सोनिया गांधी यांनी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात प्रियांका गांधी यांची भेट घेतली. यावेळी तिथे मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते जमले होते. प्रियांका यांना भेटल्यानंतर सोनिया गांधी निघून गेल्या. ज्यानंतर थोड्याच वेळात प्रियांका गांधींची पोलिसांनी सुटका केली. दरम्यान, याचवेळी सोनिया यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली होती.
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
दुसरीकडे काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांना घेऊन जाणारी पोलीस बस ही छत्रसाल स्टेडियमवर दाखल झाली. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे काढलेल्या मोर्चा आणि आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांना बसने छत्रसाल स्टेडियमवर आणण्यात आले होते. अखेर रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास सर्व काँग्रेस नेत्यांची सुटका करण्यात आली.
हे ही वाचा>> राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, नाकही फुटलं.. मोदींच्या घराबाहेर काय-काय घडलं?
मंगळवारी दुपारी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे हे नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचले. या घडामोडीमुळे दिल्ली पोलीस आणि सरकार दोघेही चिंतेत पडले आहेत.
जेव्हाही पंतप्रधान मोदी प्रवास करतात किंवा त्यांच्या शासकीय निवासस्थानी परत येतात, तेव्हा त्यांचा ताफा याच गेटमधून जातो. म्हणूनच, जेव्हा राहुल गांधी या गेटजवळ धरणे आंदोलनावर बसले होते, तेव्हा गृहसचिवांनी स्वतः त्यांना या ठिकाणी धरणे आंदोलन न करण्याची विनंती केली होती, कारण हे ठिकाण धरणे आंदोलनासाठी अनुकूल नव्हते. यापूर्वी, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनीही राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना तिथे धरणे आंदोलन न करण्याचा सल्ला दिला होता.
मात्र, राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी सांगितले की, ते आपले धरणे आंदोलन इथेच सुरू ठेवतील आणि सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. या गोंधळाच्या दरम्यान, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह स्वतः काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलण्यासाठी आले.
हे ही वाचा>> आता पवारही उतरले मैदानात, अभिजीत दिपकेंना जाऊन भेटले.. पुढच्या क्षणी केलं 'ते' ट्विट!
जितेंद्र सिंह यांनी दावा केला की, राहुल गांधी यांनी स्वतः त्यांना सांगितले की, जर सरकारने संसदेत पेपर फुटीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सहमती दर्शवली, तर ते आपले धरणे आंदोलन संपवतील.
राहुल गांधींची मागणी ऐकल्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुन्हा राहुल गांधींशी संवाद साधला. जितेंद्र सिंह सांगतात की, यावेळी त्यांनी राहुल गांधींना सांगितले की, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकार तयार आहे.
मात्र, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरचे आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेऊन तेथून हटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. राहुल गांधी जमिनीवर झोपले, त्यानंतर पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने बसमध्ये नेले. तेथून त्यांना छत्रसाल स्टेडियममध्ये नेण्यात आले होते तर प्रियांका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलेले. मात्र, काही वेळापूर्वीच त्या दोघांचीही सुटका करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT












