यंगस्टर्सनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या वन-डे सामन्यात भारताने इंग्लंडवर ६६ धावांनी मात केली आहे. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३१८ रन्सचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ २५१ पर्यंत मजल मारु शकला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मात्र यानंतर प्रसिध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर यांनी टिच्चून मारा करत इंग्लंडला मोक्याच्या क्षणी धक्के देत सामन्यात पुनरागमन केलं.
ADVERTISEMENT
टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन ओएन मॉर्गनने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. टी-२० मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या शिखर धवनने वन-डे सामन्यात रोहित शर्माच्या सोबतीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. बेन स्टोक्सने रोहित शर्माला आऊट करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. मात्र दुसऱ्या बाजूने शिखर धवन आणि विराट कोहलीने टीम इंडियाची बाजू सावरुन धरली. मार्क वुडने विराटला आऊट करत टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. विराट ५६ रन्स काढून आऊट झाला. यानंतर अखेरच्या फळीत लोकेश राहुल आणि कृणाल पांड्याने इंग्लंडच्या बॉलर्सची धुलाई करत टीम इंडियाला ३०० चा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ३, मार्क वुडने २ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या ओपनर्सनी चांगली सुरुवात केली. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी भारतीय बॉलर्सची धुलाई करत इंग्लंडची बाजू वरचढ केली. पहिल्या विकेटसाठी दोन्ही बॅट्समननी १३५ रन्सची पार्टनरशीप केल्यानंतर इंग्लंड सामन्यात बाजी मारेल असं वाटत होतं. परंतू प्रसिध कृष्णाने जेसन रॉयला आऊट करत इंग्लंडला धक्का दिला. यानंतर इंग्लंडच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. ६६ बॉल्समध्ये ६ फोर आणि ७ सिक्स लगावणाऱ्या बेअरस्टोलाही ठाकूरने आऊट केलं. अखेरीस इंग्लंडची संपूर्ण टीम २५१ रन्सवर आऊट झाली. भारताकडून प्रसिध कृष्णाने ४, शार्दुल ठाकूरने ३, भुवनेश्वर कुमारने २ तर कृणाल पांड्याने १ विकेट घेतली.
ADVERTISEMENT











