IPL 2021 : KKR जितबो रे…अंतिम फेरीत चेन्नईसोबत विजेतेपदासाठी लढणार

मुंबई तक

• 06:04 PM • 13 Oct 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. युएईत दाखल झाल्यानंतर KKR ने पकडलेली विजयाची लय त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ३ विकेटने धुव्वा उडवत KKR ने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल १३६ धावांचं आव्हान कोलकाता एका क्षणाला […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामात ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. युएईत दाखल झाल्यानंतर KKR ने पकडलेली विजयाची लय त्यांनी अखेरपर्यंत कायम ठेवली आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ३ विकेटने धुव्वा उडवत KKR ने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

हे वाचलं का?

दिल्लीने विजयासाठी दिलेल १३६ धावांचं आव्हान कोलकाता एका क्षणाला सहज पूर्ण करेल असं वाटत होतं. परंतू २ बाद १२३ वरुन KKR ची अवस्था ७ बाद १३० अशी दयनीय झाली. अखेरीस राहुल त्रिपाठीने आश्विनच्या पाचव्या बॉलवर विजयासाठी आवश्यक धावा खणखणीत षटकार मारत पूर्ण केल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या पराभवासह सलग दुसऱ्या वर्षी दिल्लीचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. २०२० मध्ये दिल्लीला अंतिम फेरीत मुंबईकडून पराभव स्विकारावा लागला होता.

टॉस जिंकून इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. वरुण चक्रवर्तीने पृथ्वीला माघारी धाडत दिल्लीला पहिला धक्का दिला. यानंतर शिखर आणि स्टॉयनिसने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू KKR ने या सामन्यात आपलं हुकुमी अस्त्र वापरत दोन्ही बाजूंनी स्पिनर्सचा मारा केला. ज्यामुळे दिल्लीचा संघ मोक्याच्या क्षणी धावा जमवूच शकला नाही.

ठराविक अंतराने दिल्लीचे एक-एक फलंदाज माघारी परतत राहिले. परंतू एकही फलंदाज मोठे फटके खेळण्यात यशस्वी झाला नाही. ज्यामुळे दिल्लीने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट गमावत १३५ धावांपर्यंत मजल मारली. KKR कडून वरुण चक्रवर्तीने २, फर्ग्युसन आणि मावीने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल KKR ने धडाकेबाज सुरुवात केली. व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी मैदानावर स्थिरावून फटकेबाजीला सुरुवात केली. विशेषकरुन व्यंकटेश अय्यरने फटकेबाजी करत दिल्लीवर दडपण बनवायला सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. या दरम्यान अय्यरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. ४१ बॉलमध्ये ४ फोर आणि ३ सिक्स लगावत अय्यरने ५५ धावा केल्या. कगिसो रबाडाने त्याला आऊट करत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं.

यानंतर नितीश राणा आणि शुबमन गिल यांनी संघाच्या डावाला पुन्हा एकदा आकार दिला. नॉर्ट्जेने राणाला आऊट करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. यानंतर KKR च्या डावाला अनपेक्षित गळती लागली. २ बाद १२३ वरुन KKR चा संघ ७ बाद १३० वर कोसळला. अखेरच्या ओव्हरमध्येही संघाला विजयासाठी ७ धावांची गरज असताना आश्विनने लागोपाठ दोन विकेट घेत KKR च्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. परंतू राहुल त्रिपाठीने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. १५ तारखेला कोलकात्याचा संघ अंतिम फेरीत चेन्नईशी विजेतेपदासाठी खेळणार आहे.

    follow whatsapp