
गणेश उत्सव एकदम धुमधडाक्यात आणि पूर्वीच्या उत्साहात साजरा होतो आहे. दोन वर्षे कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येत होता. अशात यावर्षी निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा केला जातो आहे. लालबागचा राजा गणपतीलाही पूर्वीप्रमाणेच गर्दी होऊ लागली आहे.
लालबागचा राजा गणपतीच्या राजकारणी, सेलिब्रिटी सगळ्यांचीच गर्दी होत असते. तसंच लालबागचा राजा हा नवसाला पावतो अशीही ख्याती आहे. दरवर्षी लालबागचा राजाच्या नवसपेटीत असंख्य पत्रं येत असतात. यातलं एक भावनिक पत्र सध्या चर्चेत आहे. हे पत्र एका आईने लिहिलं आहे.
कोरोना संकटानंतर लालबागचा राजा येत आहे. पण त्याच्या दर्शनाची आस लागलेली मुलगी आज आता या जगात नाही. २०१९ साली लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत मी आणि माझी मुलगी आठ तास उभे होतो. रांग जराही पुढे न सरकल्याने तिचे पाय दुखून रांगेत उभं राहणं अशक्य झालं. तेव्हा ती जवळच उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डशी बोलायला गेली. तिथे त्याने तिच्या मनाला लागेल अशी काहीतरी चुकीची भाषा वापरून विचित्र उत्तरं दिली. ते सगळं ऐकून संतापलेल्या मुलीने मला रांगेतून बाहेर काढलं. दर्शनासाठी न थांबताच घरी म्हणजेच नवी मुंबईत आणलं. तिचं मानसिक संतुलन बिघडलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी गळफास लावून तिने स्वतःला संपवलं.
या पत्रात कोपऱ्यात एक चित्र काढलं आहे, ते चित्र माझ्या मुलीने काढलं आहे. ते चित्र माझ्या मुलीची शेवटची आठवण ठरलं. हे चित्र लालबागच्या राजाच्या पेटीत ठेवायचं होतं. कार्यकारी मंडळ नवसाच्या पेटीतील योग्य सूचनेप्रमाणे कृती नक्की करते हा तिचा विश्वास होता. ही तिची इच्छा शेवटची इच्छा ठरली. म्हणून आम्ही हे पत्र आणि चित्र बाप्पाच्या चरणी वाहतो आहोत. ती पूर्ण करण्यासाठी आपण आम्हाला यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बसायला बाक किंवा खुर्च्या देऊ शकला तर तिच्या दिवंगत आत्मयाला शांती मिळेल अशी आमची भाबडी समजूत.
मुलीचे दुःखी आई, वडील आणि बहीण
असं पत्र लालबागच्या राजाच्या चरणी वाहण्यात आलं आहे. मुंबईतल्या लालबागच्या राजाच्या दानपेटीत गणेशभक्तांकडून जितकं सढळ हातानं दान करण्यात येतं, तितक्याच सहजतेनं काही भक्त आपलं मनही देवाकडे मोकळं करत असतात. ही भक्तमंडळी दरवर्षी लालबागच्या राजाला पत्र लिहून गाऱ्हाणं मांडत असतात. असंच एक पत्र या माऊलीनं लालबागच्या राजाला लिहिलं आहे. या पत्राची चर्चा होते आहे.