'सुरांची बाग उजाड झाली..' आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक; शरद पवारांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केल्या भावना

मुंबई तक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आशाताईंच्या जाण्याने भावूक झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने सुरांची बाग उजाड झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

Fadnavis on death of Asha Bhosale
Fadnavis on death of Asha Bhosale
Google CTA

बातम्या हायलाइट

point

सुरांची बाग उजाड झाली..

point

आशा भोसले यांच्या निधनाने फडणवीस भावूक

point

रोहित पवारांनीही व्यक्त केला शोक

Fadnavis on death of Asha Bhosale : भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने फक्त भारतीय संगीतविश्वातूनच नव्हे तर राजकीय, सामाजिक स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आशाताईंच्या जाण्याने भावूक झाले आहेत. आशा भोसले यांच्या जाण्याने सुरांची बाग उजाड झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस भावूक

आशा भोसले यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करताना फडणवीस म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली.

आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति