'एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात हवा गेलीये' असं मनोज जरांगे पाटील का बोलले?
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी रद्द होत असल्याचा आरोप करत जरांगे पाटलांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात हवा गेलीये'
असं मनोज जरांगे पाटील का बोलले?
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन केली आहे. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि महायुतीतील नेत्यांवर अतिशय तिखट शब्दांत हल्लाबोल केला. सरकारने मराठा समाजावर जाणूनबुजून अन्याय सुरू केल्याचा गंभीर आरोप करत, मराठ्यांच्या हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिसकावून घेण्याचे षडयंत्र आखले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आदेश
जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. बावनकुळे यांनी मराठ्यांना मिळालेली जात वैधता प्रमाणपत्रे (व्हॅलिडिटी) रद्द करण्यासाठी पत्र दिल्याचे सांगत, जरांगे यांनी हे सगळे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा केला. "एकाच घरातील भावाला व्हॅलिडिटी मिळते आणि बहिणीची रद्द केली जाते, असा अन्याय सुरू आहे. पाच दिवसांत प्रमाणपत्रे रद्द करण्याचे आदेश देणारे हे कोणते सरकार?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा : फॉर्च्युनरचा वेग 150, मिसिंग लिंकमध्ये अपघात कसा झाला? पोलिसांनी सांगितलं...
सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा
सरकार केवळ मराठ्यांचेच नव्हे, तर शेतकरी, धनगर, दलित, मुस्लिम, बंजारा आणि मायक्रो ओबीसी समाजाचे वाटोळे करत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. समृद्धी आणि शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून त्यांना उद्ध्वस्त केले जात असल्याचे ते म्हणाले. निवडणुका पार पडल्यानंतर आणि बहुमत मिळाल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेल्याची टीका करत, येत्या 29 ऑगस्टपासून या सत्तेतील मस्ती उतरवण्यासाठी मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला.
हे ही वाचा : बीडमध्ये तब्बल दोन कोटींचं बनावट खाद्य तेल कसं तयार करण्यात आलं?
नोंदी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न
मराठा समाजाला सावध राहण्याचे आवाहन करताना जरांगे पाटील म्हणाले की, बोगस नोंदींच्या नावाखाली 58 लाख नोंदी कमी करण्याचा आणि सातारा, कोल्हापूर व पुणे गॅझेट दडपण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा आमदारांनीही समाजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अन्यथा जनता त्यांना पळता भुई थोडी करेल. मराठा तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि सरकारचे षडयंत्र मोडून काढण्यासाठी सर्वांनी घरात न बसता या लढ्यात सक्रिय व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
