Maharashtra Monsoon: केरळमधून अवघ्या 24 तासात मान्सून महाराष्ट्रात? 35 वर्षात पहिल्यांदाच असं कसं घडलं?
Maharashtra Monsoon Update: केरळमधून मान्सून अवघ्या 24 तासात मुंबईत पोहचल्याची ऐतिहासिक घटना यंदा घडली आहे. याआधी 35 वर्षांपूर्वी असं घडलं होतं.
ADVERTISEMENT

मुंबई: नैऋत्य मान्सूनने यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत केरळमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका दिवसात, म्हणजेच 26 मे 2025 रोजी, महाराष्ट्रात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, केरळमध्ये 24 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले, जे गेल्या 35 वर्षांतील सर्वात जलद आगमन आहे. त्यानंतर अवघ्या 24 तासात मान्सूनने महाराष्ट्र गाठला आहे. दरवर्षी मान्सून केरळातून महाराष्ट्रात पोहचण्यासाठी 6 ते 7 दिवसांचा कालावधी घेतो. मात्र, यंदा पहिल्यांदाच पावसाने अत्यंत वेगवान मजल मारली आहे. यंदा मे महिन्यात सरासरीपेक्षा प्रचंड पावसाची नोंद झाली आहे, जी एक ऐतिहासिक घटना मानली जात आहे.
केरळ ते महाराष्ट्र: मान्सूनचा अत्यंत जलद प्रवास
हवामान खात्याच्या अहवालानुसार, यंदा अरबी समुद्रातील अनुकूल चक्रीय वातावरण आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण झालं आणि त्याला प्रचंड गती मिळाली. त्यामुळे केरळमध्ये 1 जून ऐवजी 24 मे रोजीच मान्सून दाखल झाला. पण त्यानंतर जे झालं त्यामुळे अवघा महाराष्ट्र चक्रावून गेला आहे.
हे ही वाचा>> मुंबईसह उपनगरात पावसाचं थैमान; मध्य रेल्वेतील 'या' रेल्वेस्थानकात शिरलं पाणी, मुंबईकरांची दैना
कारण अवघ्या 24 तासात मान्सून हा केरळहून महाराष्ट्रात दाखल झाला. सध्या मान्सून तळकोकणात पोहोचला आहे. जो आता लवकरच उर्वरित महाराष्ट्रात पोहचेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, 5 जूनपर्यंत मान्सून दक्षिण कोकण आणि गोव्यात स्थिर होईल, तर 15 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल.
मुंबईत पावसाचं थैमान, पुढील काही तास महत्त्वाचे
मुंबईसह काही उपनगरांमध्ये पावासाचा जोर कायम पाहताना दिसत आहे. परळ, दादर हिंदमाता तसेच पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर पावसाचे पाणी साचलं आहे. त्याचप्रमाणे काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. यामुळे प्रवाशांना लोकलच्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.










