मुंबई : गणपती आगमनाला गालबोट, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू; काय घडलं?

मुंबई तक

'भुलेश्वरचा राजा' या सार्वजनिक गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान श्रींची मूर्ती अचानक कोसळली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Ganesh Idol Accident
Mumbai Ganesh Idol Accident
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गणपती आगमनाला दुर्दैवी गालबोट

point

भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू

point

काय घडलं?

Mumbai Ganesh Idol Accident : मुंबईत गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात भुलेश्वर परिसरात शनिवारी (22 ऑगस्ट) रात्री एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. 'भुलेश्वरचा राजा' या सार्वजनिक गणपतीच्या आगमन मिरवणुकीदरम्यान श्रींची मूर्ती अचानक कोसळली. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास बलराम मर्चेंट रोडवरील कबुतरखान्याजवळ असलेल्या जय अंबे चौकात हा भीषण अपघात झाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात मूर्ती मंडपाकडे जात असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि अनेक नागरिक या मूर्तीखाली दाबले गेले.

दोघांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

या भीषण अपघातामध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, वाहतूक पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेच्या बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत नेवशे (33) आणि बृजेश हेमंत जोशी (30) या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण भुलेश्वर परिसरावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : मोदींच्या 'त्या' इंस्टाग्राम व्हिडीओवरुन राहुल गांधींची टीका, मुलींना पितृसत्ता मोडून काढण्याचे आवाहन

दोन लहान मुलीही जखमी

अपघातातील जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या दोन लहान मुलींसह एकूण पाच जणांचा समावेश आहे. वैभव घेनंद (38), पवन चौरसिया (25), लावण्या गनेर (5), दिव्या गनेर (7) आणि कुणाल काशिद (26) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सध्या जवळच असलेल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली. सध्या पाचही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात मुलासह वडिलांची 300 फूट खोल दरीत उडी, आईनं पाहिलं अन्..

किती अर्जांना मंजुरी?

महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सव अत्यंत दणक्यात साजरा केला जातो आणि यंदा 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होत आहे. यंदा महापालिकेला मंडप उभारणीसाठी 3767 अर्ज प्राप्त झाले होते, ज्यापैकी 2729 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगमनाच्या भव्य मिरवणुका निघत असतानाच भुलेश्वरमधील घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आणला असून, या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.