मुंबईची खबर : मुंबईकरांचा प्रवास महागणार! रिक्षा अन् टॅक्सीच्या भाड्यात वाढ
आधीच महागाईने कंबरडे मोडलेले असताना मुंबईकारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबईकरांचा प्रवास महागणार!
रिक्षा अन् टॅक्सीच्या भाड्यात वाढ
Mumbai News : मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी प्रवाशांच्या खिशाला 1 सप्टेंबर पासून अधिक कात्री लागणार आहे. प्रशासनाने भाडेवाढीचा निर्णय घेतला असून नवीन दरपत्रक लागू होणार आहे. त्यानुसार रिक्षाच्या भाड्यात 1 रुपया आणि टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हे नवीन दर मुंबई शहरासह ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या सर्व भागांत एकाच वेळी लागू होतील.
सुधारित भाडेवाढ जाहीर
यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये करण्यात आले होते. आता त्यापाठोपाठ अवघ्या काही महिन्यांतच पुन्हा एकदा ही सुधारित भाडेवाढ जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा : सेंटर पॉईंट : रेशमा पारधी यांचं निकृष्ट आहारावर व्हिडीओ करणं म्हणजे सरकारची बदनामी?
वाहतूक संघटनांची मागणी
रोजच्या प्रवासासाठी रिक्षा आणि टॅक्सीवर अवलंबून असणाऱ्या हजारो प्रवाशांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे. विशेषतः कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या नागरिकांचा दैनंदिन खर्च यामुळे वाढणार आहे. इंधनाचे वाढते दर, वाहनांच्या देखभालीचा खर्च आणि इतर दैनंदिन ऑपरेटिंग खर्च वाढल्यामुळे भाडेवाढ करण्यात यावी, अशी मागणी वाहतूक संघटनांकडून सातत्याने केली जात होती.
हे ही वाचा : शौचासाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत, नवऱ्याला बलात्काराचा संशय
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
सतत होणाऱ्या या भाडेवाढीमुळे नोकरदार वर्ग आणि सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा सामना करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. 1 सप्टेंबर पासून प्रवाशांना या नवीन आणि वाढीव दरांनुसारच भाडे द्यावे लागेल. त्यामुळे आधीच महागाईने कंबरडे मोडलेले असताना ही भाडेवाढ मुंबईकारांच्या खिशाला कात्री लावणार आहे.
