नवरा अडाणी, बायको पदवीधर.., इन्स्टाग्राममुळे मोहम्मदच्या नादी लागली; पतीला थंड डोक्याने संपवलं; पुढे काय घडलं?
Crime News : सोशल मीडियावरील रिल्सच्या नादापाई आणि अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात बेगुसराय न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा अडाणी, बायको पदवीधर...
मोहम्मदशी अनैतिक संबंध अन् मर्डर; शेवटी काय घडलं?
Crime News : बिहारमधील बेगुसराय येथील मंझौल न्यायालयाने एका अत्यंत गाजलेल्या आणि खळबळजनक हत्याकांडात ऐतिहासिक निकाल दिला आहे. समस्तीपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महेश्वर राय यांची त्यांच्याच सासरी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायाधीश संजय कुमार सिंह यांनी मृताची पत्नी राणी कुमारी उर्फ राणी राज आणि तिचा प्रियकर मोहम्मद शहजाद या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने दोन्ही दोषींना प्रत्येकी 20,000 रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास त्यांना अतिरिक्त 1 वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 302/34 आणि 302/120 (B) अंतर्गत ही शिक्षा सुनावली असून, मृताच्या वडिलांनी या निर्णयावर समाधान व्यक्त करत हा न्यायाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
अनैतिक संबंध आणि रिल्सचा घातक छंद
या हत्याकांडाची पार्श्वभूमी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी असली तरी तिचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायक झाला. महेश्वर राय हे अशिक्षित होते आणि मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, तर त्यांची पत्नी राणी कुमारी ही पदवीधर होती. राणीला सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचे मोठे वेड होते आणि इंस्टाग्रामवर तिचे सुमारे 10,000 फॉलोअर्स होते. 2021 पासून ती सतत व्हिडिओ अपलोड करत असे आणि अनेक तरुणांशी व्हॉट्सॲपवर चॅटिंगमध्ये मग्न असायची. महेश्वरला पत्नीचे हे वागणे आणि सोशल मीडियाचे वेड मुळीच आवडत नसे, त्यातून त्यांच्यात वारंवार वाद होत असत. राणीचे समस्तीपूर येथील रहिवासी मोहम्मद शहजाद याच्याशी प्रेमसंबंध होते आणि पतीचा या संबंधांना असलेला विरोधच अखेर त्याच्या मृत्यूचे मुख्य कारण ठरला.
कट रचून हत्या आणि पोलिसांचा तपास
ही भीषण घटना 7 जानेवारी 2024 रोजी घडली, जेव्हा महेश्वर कामानिमित्त कोलकाता येथे जाणार होता. जाण्यापूर्वी राणीने त्याला आपल्या माहेरी फफौत गावात बोलावले. रात्री सुमारे 10 वाजता जेवण करून महेश्वर झोपल्यानंतर, राणीने तिचा प्रियकर शहजाद याला घरी बोलावले आणि दोघांनी मिळून राणीच्याच दुपट्ट्याने महेश्वरचा गळा आवळून खून केला. घटनेच्या अवघ्या अर्ध्या तासानंतर महेश्वरच्या भावाने त्याला फोन केला, तेव्हा फोन दुसऱ्याच कोणीतरी उचलला आणि मागून गोंधळाचे आवाज येत होते. संशय आल्यावर महेश्वरचे वडील तातडीने तिथे पोहोचले, तेव्हा सासरची मंडळी पळून गेली होती आणि महेश्वरचा मृतदेह घराबाहेर पडला होता. काही संशयास्पद तरुण मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु वडिलांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि पुढील अनर्थ टळला.
बेगुसराय पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करून राणी आणि शहजाद यांना अटक केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी राणीच्या आई आणि बहिणींच्या सहभागाचीही चौकशी केली, मात्र पुराव्याअभावी केवळ पत्नी आणि प्रियकरावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान डॉक्टर, तपास अधिकारी आणि साक्षीदारांसह एकूण 7 जणांची साक्ष नोंदवण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि वैज्ञानिक तपासाच्या आधारे न्यायालयाने हे सिद्ध केले की, हा खून पूर्णपणे पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आला होता. सुमारे 2 वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने दिलेल्या या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे समाजात एक कडक संदेश गेला असून, अनैतिक संबंध आणि आंधळ्या छंदापायी उध्वस्त झालेल्या एका कुटुंबाचे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.









